शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील भाजपा व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही. तुम्ही लिहून घ्या हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार आहे,” अशी मोठी राजकीय भविष्यवाणी आदित्य ठाकरेंनी केली. ते सोमवारी (१ ऑगस्ट) सिंधुदुर्गमधील शिवसंवाद यात्रेदरम्यान आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आदर्श बांदेकर व इतर अनेक नेते उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, “हे सर्व एक दीड महिन्याचं आहे, तुम्ही लिहून घ्या हे सरकार कोसळणार आहे. महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही. मी मंत्री म्हणून काम सुरू केलं तेव्हा पहिलं काम कोकणातील पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय घेतला.”
“आतापर्यंत महाराष्ट्रात इतकं घाणेरडं राजकारण पाहिलं नाही”
“सध्या दोन लोकांचं जंबो मंत्रीमंडळ आहे. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री हेच कळत नाही. कुणी कुणाला बोलू देत नाही. सध्या त्यांचं लक्ष घाणेरड्या राजकारणावर आहे. मी आजोबा आणि वडिलांसोबत लहानपणापासून फिरलो, पण इतकं घाणेरडं राजकारण पाहिलं नाही,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला.
“ज्याने राजकीय ओळख दिली त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला”
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “पक्ष फोडो, गद्दारी करा, ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, तुम्हाला राजकीय ओळख दिली, सगळं काही दिलं त्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणं ही कधीही महाराष्ट्राची ओळख नव्हती. मी आज तुम्हाला इतकंच विचारायला आलो आहे की, हे घाणेरडं राजकारण तुम्हाला पटतंय का? हे सरकार बेकायदेशीर तर आहेच, पण गद्दार आणि बेईमानांचं सरकार आहे.”
हेही वाचा : Photos : सकाळी सात वाजता घरात, १० तास चौकशी, दिवसभरात ईडीकडून संजय राऊतांवर नेमकी काय कारवाई? वाचा…
“…तर देशात किती अस्थिरता निर्माण होईल”
“इथून २० आमदार फोडा, तिथून ३० आमदार फोडा, तिथून पाचचा गट घ्या अशी सरकारं बनायला लागली तर देशात किती अस्थिरता निर्माण होईल याचा विचार करा. आज देशात बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे,” असंही ठाकरेंनी नमूद केलं.