[ad_1]
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन महिना उलटल्यानंतर अखेर मंगळवारी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. मात्र, अपक्ष आणि मित्रपक्षांना सहभागी करून घेतलं नसल्यामुळे त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ‘प्रहार’ संघटनेचे बच्चू कडू यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांवर टीका केली आहे. विशेषत: शिवसेनेतून बाहेर पडून शिंद गटात दाखल झालेल्या आमदारांना त्यांनी लक्ष्य केलं आहे.
“मराठी मुंबईतून लोढांना मंत्रीपद”
मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपद दिल्यावरून किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करते. मराठी मुंबईतून त्यांनी मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपद दिलं. अर्थात हा त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे. पण आमच्याकडून गेलेला आणि शिवसेना आमची आहे असं म्हणणारा मुंबईतला एकही आमदार मंत्री होऊ शकला नाही. ही मुंबईची शोकांतिका आहे”, असं किशोरी पेडणेकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
“मंत्री झालेल्यांचा पाळणा…”
दरम्यान, यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी मंत्री झालेल्या आमदारांवर खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “जे मंत्री झाले, त्यांचा पाळणा वेगवेगळ्या पक्षात हललेला पाहायला मिळाला आहे. ते आमच्याकडे आले, तेव्हा त्यांचा शिवसेनेनं बहुमान केला. आजही शिवसेना आमची, धनुष्यबाण आमचं, बाळासाहेब देखील आमचेच म्हणायचं पण शपथ घेतल्यानंतर एकाही मंत्री महोदयांना वाटलं नाही की बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जावं. याचा अर्थ फक्त स्वत:च्या फायद्यासाठी बाळासाहेब वापरायचे. त्यांचं नाव वापरायचं”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
“भाजपा त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो, कारण…”, शरद पवारांचा गंभीर आरोप
“बाळासाहेबांच्या ठाकरे घराण्याला संपवायचं कसं? याचा विडा सगळ्यांनी उचलला आहे”, असा दावा देखील किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
[ad_2]