Headlines

ऑस्ट्रेलिया मधील वेस्टर्न सिडनी विद्यापीठाकडून सांगलीच्या शशांक कुलकर्णी यांचा गौरव

सांगली – वाळवा तालुक्यातील साखराळे येथील संशोधक शशांक कुलकर्णी यांना नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्लोबल एज्युकेशन कॉन्क्लेव – 2021’ या जागतिक संशोधन परिषदेमध्ये  ‘ग्लोबल यंग अस्पिरंट’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही परिषद ऑस्ट्रेलिया या देशातील  वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या सेंटर फॉर स्मार्ट मॉडर्न कन्स्ट्रक्शन तसेच प्रोफेसर जी. डी. अग्रवाल सेंटर फॉर सायंटिफिक डेव्हलपमेंट अँड एन्वाइरन्मेंट एडवोकेसी, ग्रीन थिंकर जेड इंडिया आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्गनाइज्ड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यावर्षी या जागतिक परिषदेचे आयोजन कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आभासी माध्यमाद्वारे करण्यात आले होते. दरवर्षी वैश्विक पातळीवर आयोजित केली जाणारी ही महत्वपूर्ण परिषद शाश्वत विकासासाठी कार्य करणाऱ्या संशोधक व शैक्षणिक क्षेत्रातील विद्वानांसाठी एक प्रबळ जागतिक व्यासपीठ म्हणून कार्य करते.

या परिषदेमध्ये जगाच्या शाश्वत विकासासाठी योगदान देणाऱ्या युवा संशोधक, शास्त्रज्ञ, लेखक, प्राध्यापक यांचा सन्मान केला जातो. परिषदेच्या व्यवस्थापन सदस्य गुनीत कौरा यांनी सूत्रसंचालन केले. ग्रीन थिंकर या संस्थेचे अध्यक्ष तन्वीर सिंह यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.  सौदी अरेबिया मधील एफिया बानो, फिलिपाईन्स मधील डॉ. जॉन विन्सेंट, श्रीलंकेमधील डॉ. प्रसन्ना कुमारी, ग्रीसमधील रानिया लमपाऊ यांसारखे विविध देशातील तज्ञ या परिषदेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले होते. भारताच्या राष्ट्रपतीं कडून नॅशनल आयसीटी अवॉर्ड तसेच अत्यंत मानाचा समजला जाणारा फुल्ब्राईट डिस्टिंग्विश्ड पुरस्कार प्राप्त शिक्षण तज्ञ अमित कुमार यांनी समारोपाचे भाषण केले.

हा पुरस्कार शशांक कुलकर्णी यांना त्यांच्या भारतातील शेती व शेतकरी धोरणांवरील संशोधन कार्यासाठी देण्यात आला आहे. शशांक हे अग्रिकल्चर  इंजिनियर आहेत. त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून अग्रिकल्चर  इंजिनियरिंग या विषयात पदवी संपादित केली आहे. ते मूळचे वाळवा  तालुक्यातील साखराळे येथील असून  सध्या युजिसीचे सिनियर रिसर्च फेलो म्हणून जम्मू काश्मीर मधील जम्मू केंद्रीय विद्यापीठाच्या लोकनिती व लोकप्रशासन या विभागात मागील साडे चार वर्षे भारताच्या शेती व शेतकरी धोरणांवर संशोधन करीत आहेत. यामध्ये राष्ट्रीय शेतकरी धोरण , स्वामिनाथन आयोग, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यावरील शाश्वत धोरणात्मक उपाय यांसारख्या भारतातील  शेती व शेतकरी यांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांचा समावेश आहे.  त्यांनी आतापर्यंत विविध विषयांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहलेल्या पुस्तकांपैकी सहा पुस्तके प्रकाशित झाली असून उर्वरित पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या  संशोधनावर  आधारित ‘स्वामिनाथन कमिशनः ए फाऊंडेशन ऑफ फार्मर पॉलिसीज इन इंडिया’ या पुस्तकास भारतीय हरित क्रांतीचे जनक प्रो. एम. एस. स्वामिनाथन यांची प्रस्तावना मिळालेली आहे. जगातील वेगवेगळ्या मानांकित नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे. या पुरस्कारासाठी शशांक कुलकर्णी यांच्यावर समाजातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव  होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *