[ad_1]
बिपीन देशपांडे लोकसत्ता
औरंगाबाद : तेलंगणा भागातील कावल ते टिपेश्वरसह पैनगंगा व मराठवाडय़ातील किनवट ते औरंगाबादजवळील गौताळय़ापर्यंत वाघांसाठी मार्गिका (कॉरिडॉर) मांडण्यात आलेला एक प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. टिपेश्वरमधील वाघांची वाढती संख्या पाहता त्यांचे स्थलांतर मराठवाडय़ातील जंगलांमध्ये होण्याची चिन्हे पाहता व्याघ्र मार्गिकेची अत्यंतिक गरज असल्याचे अभ्यासक सांगत आहेत. तर सुमारे ७० वर्षांनंतर गौताळय़ात व्याघ्र दर्शन होत असून दीड वर्षांपासून स्थिरावलेल्या तरुण वाघाला आता वाघिणीची आवश्यकता भासणार असल्याने आणि ती मिळण्याची शक्यता नसल्याने तो अधिवास हलवेल, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पैनगंगा हे अभयारण्य विदर्भात भौगोलिकदृष्टय़ा विस्तारलेले असले, तरी त्याचे प्रशासकीय कामकाजाचे कार्यालय हे मराठवाडय़ात आहे. या पैनगंगा अभयारण्यातही एक वाघ मागील काही महिन्यांपासून स्थिरावला आहे. तर औरंगाबादजवळील २१ हजार हेक्टर क्षेत्रात व्यापलेल्या गौताळय़ातही एक वाघ २०२१ मधील मार्च महिन्यापासून अधिवासात आहे. मात्र, अंदाजे चार वर्षांचा हा वाघ तरुण वयामध्ये असल्याने तो आता वाघिणीच्या शोधात असणार आहे. गौताळय़ात त्याला आवश्यक असलेली शांतता, मुबलक पाणी, शिकारीसाठी निलगाई, हरणे, रानडुकरांसह इतर प्राणी असले, तरी त्याला वाघिणीची गरज पाहता तो गौताळय़ातून अधिवास हलवण्याचीच अधिक शक्यता आहे. परिणामी १९५४ नंतर सत्तर वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर गौताळय़ासारख्या बहुतांश भाग मराठवाडय़ात मोडणाऱ्या जंगलात पुन्हा व्याघ्र दर्शन दुरापास्त होणार आहे, असे अभ्यासकांचे मत आहे.
नांदेड येथील मानद वन्यजीव रक्षक अितद्र कट्टी यांनी सांगितले, की किनवटलगत असलेल्या टिपेश्वर जंगलात ३२ वाघ असून येत्या पाच वर्षांमध्ये त्यांचा अधिवास मराठवाडय़ात वाढेल. वाघ ज्या दोन कारणांसाठी अधिवास बदलतो. त्यातले एक कारण वाघिणीचा शोध आहे. किनवट भागात सध्या चार ते पाच वाघ आहेत. त्यात काही बछडे आहेत.
व्याघ्र मार्गिकेचा एक प्रस्ताव सादर केलेला आहे. मात्र, त्याला गती मिळालेली नाही. कावल ते टिपेश्वर, पैनगंगा, माहूर, किनवट असा मार्गिकेचा मार्ग आहे. या भागांमध्ये अस्वलांचीही लक्षणीय संख्या आहे. वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष तीव्र होणार नाही यासाठी आतापासून जनजागृती करणे गरजेचे आहे. प्रस्तावित मार्गिकेमुळे वाघ-वाघिणीतील समागमामध्ये आनुवांशिकतेचा प्रश्न निर्माण होणार नाही. टिपेश्वर, पैनगंगा, किनवट या भागातील वाघ-वाघिणीमधील अनेकांमध्ये भाऊ-बहिणींचे नाते येते.
– अितद्र कट्टी, मानद वन्यजीव रक्षक, नांदेड.
व्याघ्र मार्गिकेच्या प्रस्ताव आहे. त्यावर कार्यवाही सुरू आहे. गौताळय़ात सध्या एकच वाघ आहे. मार्गिकेसाठी एकपेक्षा अधिक वाघांचे स्थलांतर अपेक्षित असते. अनेक तांत्रिक बाजूंचाही विचार केला जातो.
– डॉ. राजेंद्र नाळे, प्र. विभागीय वनअधिकारी (वन्यजीव), औरंगाबाद
[ad_2]