Headlines

मुंबईतील डॉक्टरांकडून शवविच्छेदन करा! ; नंदुरबारमधील महिलेच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी कुटुंबाची मागणी

[ad_1]

नंदुरबार : मुलीवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वडिलांनी तिचा मृतदेह ४४ दिवसांपासून मिठाच्या खड्डय़ात पुरून ठेवल्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने मंगळवारी प्रसिद्ध केल्यानंतर याबाबत वेगाने हालचाली सुरू झाल्या. तालुका दंडाधिकाऱ्यांनी पुन्हा शवविच्छेदनासाठी परवानगी दिल्याने पोलीस मंगळवारी आरोग्य पथकासह खडक्या गावात दाखल झाले. मात्र, मुंबईतील डॉक्टरांकडूनच शवविच्छेदन करण्याची मागणी करून ग्रामस्थांनी या पथकाला परत पाठवले.

माहेरी आलेल्या मुलीवर १ ऑगस्टला बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. मात्र, तिच्या शवविच्छेदनात बलात्कारासंदर्भातील कुठलीही चाचणी न झाल्याने वडिलांनी तिचा मृतदेह ४४ दिवसांपासून अंत्यसंस्काराविनाच मिठाच्या खड्डय़ात ठेवला. पुन्हा शवविच्छेदन करण्यासाठी वडिलांनी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले. अखेर पुन्हा शवविच्छेदनाच्या परवानगीसाठी पोलिसांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. परवानगी मिळाल्यानंतर पोलीस आरोग्य पथकासह मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास खडक्या येथे पोहोचले. परंतु, पीडितेच्या वडिलांसह गावकऱ्यांनी या पथकाकडून शवविच्छेदनास विरोध दर्शविला.

स्थानिक डॉक्टरांनी पहिल्या शवविच्छेदनात त्रुटी ठेवल्या असून, पुन्हा तेच शवविच्छेदन करणार असल्याने त्यांच्यावर विश्वास कसा ठेवावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुंबईत शवविच्छेदन करावे अथवा मुंबईच्या वैद्यकीय पथकामार्फत येथे शवविच्छेदन करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणात मुलीच्या मृत्यूआधीची ध्वनिफित असल्याने या गुन्ह्यात खुनाच्या कलमासह अत्याचाराच्या कलमांचा समावेश करण्याची मागणीही  गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे, अर्जन पटले आदी पोलीस अधिकाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांशी चर्चा सुरू होती.

आरोग्य, पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करा

धडगाव तालुक्यातील महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी योग्य कार्यवाही न केल्याबद्दल संबंधित आरोग्य आणि पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली. महिलेचा मृत्यू संशयास्पद असतानाही पोलिसांनी मात्र आत्महत्येची नोंद केली. तिचे शवविच्छेदनही त्याच पद्धतीने करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी आणि मृत महिलेचे ‘डीएनए’ तपासून हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे होते. पुन्हा शवविच्छेदन करण्याची पालकांची मागणी दीड महिने दुर्लक्षित करण्यात आली. या प्रकरणी नंदुरबारच्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *