[ad_1]
मुंबई : राज्यातील शिवसेना-भाजपचे हे सरकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची हिंदूत्वाची वैचारिक भूमिका घेऊन चालले असून आजचा ऐतिहासिक क्षण सगळेच अनुभवत आहोत. हे सरकार आणताना मला काहीही नको होते, कसल्याही पदाची अपेक्षा नव्हती. पण लोकशाहीत माझ्या वैचारिक भूमिकेला भाजपने जो पाठिंबा दिला, तो राजकीय पक्षांच्या डोळय़ात अंजन घालणारा असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी विधानसभेत शिवसेनेला लगावला.
आपला गट फोडण्यासाठी आमदारांना प्रलोभने, दबाव आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी शिवसेनेवर केला. अध्यक्ष नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव माडतांना शिंदे बोलत होते. अॅड. राहुल नार्वेकर हे स्वत: कायद्याचे उत्तम जाणकार आहेत.
कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देतील असा विश्वास व्यक्त करून शिंदे म्हणाले, ज्यांनी ज्यांनी या पदावर कार्य केले आहे, त्यांना देशपातळीवर नावाजले गेले आहे. म्हणून विधिमंडळात कायमच अध्यक्षांना एक वेगळे महत्त्व आणि मान राहिलेला आहे. तीच धुरा खांद्यावर पुढे घेऊन चालण्याची जबाबदारी आता नार्वेकर यांच्या खांद्यावर आली आहे. ती नक्कीच पूर्ण क्षमतेने निभावून नेतील आणि सभागृहाची प्रतिष्ठा उंचाविण्याचे कार्य करतील. जनतेच्या विकासासाठी काम करताना दोन्ही चाक समांतर सुरू राहतील. कायद्यासमोर सर्व समान म्हणून आपण कार्य करावे. हे सरकार पारदर्शकपणे कार्य करेल. सभागृहात कोणत्याही सदस्यांवर अन्याय होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत सत्तेतून पायउतार झालेले अनेक मंत्री आपण पाहिले, मात्र आपल्यासोबत सत्तेतून बाहेर पडण्याची नऊ मंत्री आणि ३९ सदस्यांनी हिंमत दाखविली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या एका सैनिकावर ५० सदस्यांनी विश्वास ठेवला हे आपले भाग्य समजतो.
[ad_2]