[ad_1]
माजी मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब यांच्यामागे दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. त्यांनी बांधलेले रिसॉर्ट हे बेकायदेशीर असून ते बांधण्यासाठी एवढा पैसा कोठून आला, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे. परब यांच्या मालकीच्या रिसॉर्टवर प्रशासनाने कारवाई करावी यासाठी सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता परबांचे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा- “तुम्हाला नेतृत्वाची जबाबदारी कुणी दिली? लक्षात ठेवा, तुम्हाला…”, संभाजीराजेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक?
सोमय्यांच्या हातात हातोडा
सोमय्या यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते दापोलीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा दिला. घरातून निघण्यापूर्वी सोमय्या यांच्या हातात प्रतिकात्मक भला मोठा हातोडाही होता. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे. जर हे रिसॉर्ट पाडलं नाही तर आज ना उद्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना तुरुंगात जावं लागेल, असा इशारा सोमय्या यांनी दिला.
रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे. आता पर्यावरण मंत्रालयाकडे ही फाईल आहे. ते रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देणार आहेत. पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळीपर्यंत अनिल परब यांचे रिसॉर्ट इतिहासजमा होईल,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.
रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप
अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर आहे. या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने ३१ जानेवारी २०२२ रोजी हा रिसॉर्ट ९० दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, ९० दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
हेही वाचा- “मी त्यावर एवढंच म्हणेन की…”, शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया!
ईडीकडून अनिल परबांची चौकशी
दापोली रिसॉर्ट प्रकरणी याआधी अनिल परब यांची ईडीने चौकशी केली होती. परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीने २७ मे रोजी छापेमारी केली होती. ईडीने मुंबईसह पुणे आणि रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले होते. विभास साठे यांची जमीन मी खरेदी केली आणि नंतर विकली. माझा व्यवहार अतिशय पारदर्शक आहे. ज्यांनी रिसॉर्ट बांधलं त्यांनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे. सर्व कागदपत्रे तपास यंत्रणांना देण्यात आली आहेत. यंत्रणा चौकशी करेल आणि त्यातून सत्य बाहेर येईल,” असे अनिल परब म्हणाले होते.
[ad_2]