[ad_1]
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत, “धोका देणाऱ्यांना जमीनीवर आणा” असं विधान केल्याने मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये आक्रमक भूमिका घेतल्याने या भाषणानंतर राजकीय प्रतिक्रियांना उधाण आलं आहे. या भाषणानंतर शिवसेना आणि भाजपाकडून आरोप प्रत्यारोप होत असतानाच २०२४ च्या विधानसभा निवडणुकींसंदर्भातही चर्चा सुरु झाल्या आहेत. असं असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंद दाराआड उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीसंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांकडे चौकशी केली असता असा कोणाताही शब्द देण्यात आला नव्हता असं सांगण्यात आल्याचा खुलासा केला. याच खुलाश्यानंतर मुख्यमंत्र्यांना २०२४ साली अमित शाहांबरोबरच अशाप्रकारच्या जागावाटपाच्या बैठकीला बसावं लागलं तर अशाप्रकारचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिंदे यांनी अगदी हसत मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.
“अमित शाह आज एक गोष्ट बोलले की धोका देणाऱ्यांना जमीनीवर आणा, यावर तुमचं काय मत आहे?” असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेंनी, “त्यांचं आणि कोणाची जी काही चर्चा झाली. त्याप्रमाणे ते बोलले असतील,” असं उत्तर दिलं. त्यावर पुन्हा शिंदे यांनी, “तुम्ही होता तेव्हा शिवसेनेमध्ये” असं विचारण्यात आलं. तेव्हा शिंदे यांनी, “हो, होतो ना. पण चर्चेत नव्हतो मी,” असं स्पष्टपणे सांगितलं. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिंदेंनी हे विधान केलं आहे.
पत्रकाराने शिंदे यांना याचवरुन, “तुमचं मत काय? तुम्हाला कळलं असेल ना काय झालं होतं वगैरे,” असं विचारलं. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तर उत्तर देताना, “मी याबाबतीत यापूर्वी देखील बोललो आहे. हे जे काही घडलं आणि आम्ही जो निर्णय घेतला तो राज्याच्या हिताचा झाला. यामध्ये जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांची संपर्क झाला. त्यावेळेस मी विचारलं उत्सुकतेपोटी काय आहे नक्की हे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं. जर आम्ही बिहारमध्ये नितीश कुमार यांचं संख्याबळ कमी असताना त्यांना दिलेला शब्द पाळला. संख्या कमी होती तरी त्यांना मुख्यमंत्री केलं. आज सगळ्यांनाच वाटत होतं की भाजपाला मुख्यमंत्री पद हवं म्हणून हे सुरु आहे. त्यांनी जो सर्वांचा समज होता तो गैरसमज ठरवला. माझ्यासोबत ५० लोक असतानाही माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या सैनिकाला मुख्यमंत्री केलं,” असं उत्तर दिलं.
तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्यासारख्या भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने, “आम्ही जर शब्द दिला असता तर मुख्यमंत्री पद द्यायला काही हरकत नव्हती. आमच्याकडे तर सारा देश आहे. एवढी राज्यं आहेत. आम्ही शब्द दिला असता तर दिलं असतं,” असं सांगितल्याचा खुलासा केला.
याचसंदर्भात शिंदे यांना थेट अमित शाहांबरोबरच भविष्यात म्हणजेच २०२४ साली तुम्हाला जागा वाटपासाठी बैठक करावी लागली तर असा प्रस्न विचारण्यात आला. “२०२४ मध्ये तुम्हाला अमित शाहांसोबत बंददाराआड जागा वाटपाबद्दल चर्चा करण्यासाठी बैठकीची वेळ आली. तुम्ही आधीच म्हटलं आहे की, तुमचे ५० आणि भाजपाचे १५० अशा तुम्ही २०० जागा निवडून आणणार आहात. २०२४ मध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून अडेल? पुन्हा विश्वासघात वगैरे शब्द ऐकायला येतील?” असा सविस्तर प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. मात्र या प्रश्नावर शिंदे यांनी अगदी हसत मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. “अजून काम तर करु द्या आम्हाला. अजून अडीच वर्ष आहेत. चांगलं काम करु आम्ही,” असं म्हणत शिंदेंनी या प्रश्नावर थेट उत्तर देणं टाळलं.
[ad_2]