उस्मानाबाद: जिल्ह्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते; पण यावर्षी बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. श्री.मनोज लोमटे रा. माळकरंजा,ता. कळंब असेच एक त्रस्त शेतकरी. त्यांची ५ एकर शेती, त्यापैकी ४ एकर मध्ये सोयाबीन पेरले होते. पेरणीसाठी हातउसनवारी करून खर्च भागवला होता. बियाणे मातीत टाकले पण दुर्देवाने उगवलेच नाही. झालेले नुकसान व त्यातून आलेला ताण…यामुळे त्यांनी शिवार हेल्पलाईनला कॉल केला होता. जिल्हा समन्वयक अशोक कदम यांनी जाऊन त्यांची भेट घेतली व पाहणी केली तसेच त्यांना धीर दिला. त्याच वेळी बायर कंपनीकडून शिवार फाऊंडेशनला बाजरी बियाणे दिले होते, त्यापैकी २ बॅग मनोज लोमटे यांना मोफत दिल्या व त्यांनी ते बियाणे पेरले. आज बाजरीचे पीक माळरानावर आनंदाने डोलत आहे, त्यातून मनोज लोमटे समाधानी आहेत. अडचणीच्या वेळी शिवार फाउंडेशनने केलेल्या मदतीमुळे त्यांच्या शेतातल्या बाजरीबरोबरच जीवनातही आशा फुललीे.
जिल्ह्यातील इतर गरजू शेतकऱ्यांनीही अडीअडचणीच्या वेळी शिवार हेल्पलाईनवर ८९५५७७१११५ संपर्क करावा, असे आवाहन शिवार हेल्पलाईन कडून करण्यात आले. हेल्पलाईन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.
यासाठी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई, परिवर्तन ट्रस्ट,
तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद, बायर , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे माेलाचे सहकार्य मिळत आहे.