उस्मानाबाद :- खरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तयारी सुरू झालेली आहे. सोयाबीन बियाणे चा तुटवडा होणार का?, नोंदणी कशी करावी , किंमत किती असेल? ईत्यादी प्रश्न शेतकर्यांच्या मनात आहेत. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना महाबीज कडून केल्या आहेत.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शेतकरी व इतर सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करून खरिप बियाणे नोंदणी ही तात्पुरत्या स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्याला काही सूचनांचे पालन करून आपला ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.
महाबीज कार्यालय उस्मानाबाद सन २०२१-२२ खरीप हंगाम ऑनलाईन बुकिंग फॉर्म उपलब्ध झालेला आहे. त्यासाठी पुढील प्रक्रिया आहे.https://forms.gle/nyQnC5sUMi5JYbKA7 या ऑनलाईन लिंक वर जाऊन संपूर्ण माहिती भरावी. घरातील ज्या सदस्याच्या नावे शेतजमीन आहे ,त्या प्रत्येकाची वेगवेगळी नोंदणी करावी (पती, पत्नी व 18 वर्षा आतील मुले /मुली यांची कुटुंबप्रमुखाच्या नावाने एकत्रित नोंदणी केली तरी चालेल.) तसेच आपले क्षेत्र ७/१२, ८ अ वर नमूद केल्याप्रमाणे टाकावे. शिवारानुसार वेगवेगळी नोंदणी करावी. लिंक वर ऑनलाईन माहिती फक्त इंग्रजी मध्येच भरायची आहे. ऑफलाइन नोंदणी अर्ज, चालू महिन्यातील ७/१२, ८ अ (मुळ प्रत), आधार कार्ड, बँक पासबूकची सत्य प्रत, चलन घेऊन जाते वेळी महाबीज कार्यालय उस्मानाबाद येथे जमा करावी.
नोंदणी करताना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा, अशी माहिती शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी दिली. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.
यासाठी कृषी विभाग,जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, राष्ट्रीय सेवा योजना, मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी एम.एच.आय , व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय उस्मानाबाद या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था सर्वांचे सहकार्य मिळत आहे.