Headlines

वसमत तालुक्यातील कुरुंदा गावात पावसाने हाहाःकार, पुराचे पाणी गावात शिरले, १००० पेक्षा अधिक लोकांचे स्थलांतर



हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरुंदा व परिसरात ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे हाहाःकार उडाला असून आसना नदीचे पाणी गावात शिरल्याने १००० पेक्षा अधिक ग्रामस्थांचे स्थलांतर करावे लागले आहे. तर जनावरे वाहून गेली असून मातीचे घरे पडल्याने अनेकांचे संसारोपयोगी साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले. सध्या शेकडो नागरीक उंच इमारतीच्या आश्रयला आले आहे. सकाळी चार वाजल्या पासून पोलिसांनी मदत कार्य सुरु केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, टाकळगव्हाण परिसरातील अडकलेल्या दोन कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढा असे जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत.

कुरुंदा परिसरातून आसनानदी वाहते. या नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरते. 2016 ला सुद्धा अशा प्रसंगाला ग्रामस्थांना सामोरे जावे लागले होते.कुरुंदा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली.पावसामुळे आज पहाटे तीन वाजल्या पासून पुराचे पाणी गावात शिरले.पाहता पाहता गावात चार फुटा पेक्षा अधिक पाणी झाले. घरांमधून तसेच दुकानांमध्येही पाणी शिरले. गावातील पुर परिस्थिती पाहून नदी काठच्या घरांतील तसेच गावातील शेकडो ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेे. पुरामध्ये अनेक जनावरे तसेच शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या असून कच्ची घरे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कुरुंदा परिसरातील शेतीही पाण्याखाली आली असून पुरामुळे संपूर्ण पिक नष्ट झाले आहेत. तसेच आसेगाव शिवारातही पाऊस झाल्याने या भागातील पिके खरडून गेल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

मुसळधार पावसामुळे परिसरातील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे कळताच आमदार राजेश नवघरे, उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार अरविंद बोळंगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक बोराटे यांचे पथक गावात ठाण मांडून आहेत.या पथकाकडून पुर परिस्थितीचा तसेच नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. सध्या गावातील पाणी ओसरण्यास सुरवात झाल्याचे सुत्रांनी सांगितले. गावातील सर्व माहिती घेतल्यानंतरच नेमके किती नुकसान झाले हे स्पष्ट होणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुत्रांनी सांगितले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांचे पथक पुर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

संरक्षण भिंतीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष

कुरुंदा गावात यापुर्वी १९५८, १९८२, २०१६ मध्ये मोठा पुर आल्याने गावात पाणी शिरले होते. त्यावेळीही प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे याभागात पुर संरक्षण भिंत बांधण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती.मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा गावकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कुरुंदा गावासह किनोळा, आसेगाव तसेच इतर आठ गावांमध्ये पुराचा फटका बसल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी दिली आहे.प्रशासना कडून या गावांमध्ये नुकसानीची पाहणी केली जात असून सायंकाळ पर्यंत नुकसानीचा प्राथमिक अंदाज हाती येणार आहे प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक ती मदत केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 231.70 मिलि मीटर पावसाची नोंद झाली आहे. ज्याची टक्केवारी 26.84 इतकी आहे वसमत तालुक्यातील कुरुंदा मंडळामध्ये मागे 24 तासात तब्बल 179 मिलिमीटर पाऊस झाला आहे याशिवाय गिरगाव मंडळात 167 मिलिमीटर आंबा मंडळामध्ये 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पुराग्रस्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे यांचे आदेश!

जिल्ह्यातील पूर परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दुपारी तात्काळ भ्रमणध्वनीवरून जिल्हाधिकारीजितेंद्र पापळकर यांच्याशी संपर्क साधला व पूर परिस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्तांची गैरस होणार नाही याची दक्षता घ्या, टाकळगव्हान परिसरात अडकलेल्या दोन कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढावे,जिल्ह्यातील सर्व यंत्रणा कामाला लावून,पूरग्रस्तांच्यासुरक्षतेची, पुरपरिस्थितीमध्ये जिवीत हानी होणार नाही याची काळजी घ्यावी,तसेच स्थलांतरीत झालेल्या कुटुंबाच्या भोजनाची,पाण्याची व्यवस्था करावी त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ देऊ नका, सर्व यंत्रणांनी समन्वय ठेऊन काम करावे तसेच सर्व अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी पुरग्रस्त भागात पाठविण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

Source link

Leave a Reply