[ad_1]
शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सरकारच्या काळातील निर्णयांचा आढावा घेण्यास सुरुवात केलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील महाविकास आघाडीच्या निर्णयांमध्ये शिंदे सरकार बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र आता या विषयावरुन मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी शिंदे सरकारला आव्हान दिलंय.
नक्की वाचा >> “रात्री पावणे बाराला बस पूर्ण लाईट लावून उभी होती, कंडक्टर गाडीभोवती फिरत होता, संशय आला म्हणून…”; मनसेच्या वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत
दोन आठवड्यांच्या नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात स्थापन झालेलं शिंदे गट आणि भाजपाच्या सरकारने कामाला सुरुवात केली असून अनेक जुन्या निर्णयांबद्दल शिंदे सरकाराने पुन:विचार, आढावा घेण्याचं काम सुरु केलं आहे. अगदी जिल्हा विकास निधी रोखण्यापासून ते महाविकास आघाडीच्या काळात बाजूला सारण्यात आलेल्या योजनांना पुन्हा गती देण्यासंदर्भातील निर्णय शिंदे सरकारने मागील दोन दिवसांमध्ये घेतले आहेत. सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्याच दिवशी आरेमधील मेट्रो ३ च्या कारशेडसंदर्भात महत्वाचा निर्णय घेत कारशेडचं काम सुरु करण्यासंदर्भातील निर्देश दिले.
नक्की वाचा >> “ठाकरे आणि शिंदेंना एकत्र आणण्यासाठी नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करावी, त्यांचा शब्द…”
एकीकडे शिंदे सरकारने निर्णयांचा फेरविचार आणि आढाव्याचं सत्र सुरु केलं असतानाच दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी फडणवीस सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्यसंस्थांमधील निवडणुकींसंदर्भात घेण्यात आलेले निर्णय लागू करण्याची मागणी केलीय. यामध्ये प्रामुख्याने संरपंच आणि नगराध्यक्षांची निवड पुन्हा थेट जनतेमधून करण्याची तसेच महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेत बदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. यावरुन पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरेंनी शिंदे सरकारला आव्हान दिलंय.
नक्की वाचा >> “आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे…” शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच राज ठाकरेंची सूचक पोस्ट
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनापासून पुन्हा चर्चेत आलेल्या वसंत मोरेंनी ट्विटरवरुन थेट शिंदे सरकारला आव्हान दिलंय. “सरकार बदलले, असं ऐकतोय. प्रभाग रचनाही बदलणार आहात म्हणे. सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार,” असं म्हणत मोरे यांनी एक ट्विट केलंय. पुढे ते म्हणतात, “माझे सरकारला एक आव्हान आहे. हिंमत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा, पुण्याचा महापौर मनसेचाच असेल.”
नक्की वाचा >> फडणवीसांनी उपमुख्यंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंचं पत्र; म्हणाले “ही बढती आहे की…”
नक्की वाचा >> “…इतकंच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे”; मुलाला धमकावण्यात आल्यानंतर वसंत मोरेंचा संताप
मोरेंनी केलेली मागणी मान्य करणं सध्याच्या नियमांनुसार सरकारला शक्य नसलं तरी यावर भाजपा आणि शिंदे समर्थक गटाकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदे गटाच्या बाजूने मतदान केलं होतं. मात्र आता मोरेंनी थेट सरकारविरोधी भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.
[ad_2]