[ad_1]
वर्धा : जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापूस पिकाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. सोनेगाव परिसरात पिकांची झालेली दैना बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणणारी आहे. सरासरीच्या जवळपास ५० टक्के पाऊस बरसल्याने जलपातळी चांगलीच उंचावली, त्यामुळे शेकडो गावांना धोक्याचा इशारा देत धरणांमधून पाणी सोडणे सुरू आहे. अद्यापही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरूच आहे.
नक्की वाचा >>Maharashtra News Live Updates : “मी मोदींना इशारा देतोय, महाराष्ट्राच्या गळ्याला नख लावू नका” अनंत गीतेंचं टीकास्त्र; महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट्स एकाच क्लिकवर!
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसापैकी आताच ४३ टक्के पावसाची विक्रमी नोंद झाली. प्रशासनाने १४ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देत सावधगिरीची पावले टाकणे सुरू केले आहे. निम्न वर्धा धरणाच्या सात दारातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच लाल नाला प्रकल्पाचेही पाच दारे उघडून पाणी सोडले जात आहे. साठ टक्के भरलेल्या ऊर्ध्व वर्धा धरणातून आज पाणी सोडल्या जाण्याची शक्यता व्यक्त करीत प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संततधार पाऊस व विविध धरणातील पाण्याचा विसर्ग, यामुळे पुराची शक्यता वर्तविली जात आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी रोज वाढत असल्याचे निरीक्षण आहे. अशा परिसरातील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने केली आहे.
[ad_2]