Headlines

Union Minister Raosaheb Danve criticized the opposition in a public meeting at Paithan msr 87



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी मंचावर भाजपा आणि शिंदे गटाचे मंत्री, आमदार यांच्यासह नेतेमंडळींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण होण्या अगोदर भाजपाचे केंद्रीयमंत्री आणि जालना जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचे भाषण झाले. या भाषणात दानवेंनी एक विधान केलं, ज्याची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे.

विरोधकांकडून सातत्याने शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके एकमद ओके असं म्हणत निशाणा साधला जातो, टीक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी हे विधान केल्याचं दिसून आलं आहे.

सभेत गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटपाचा गंभीर आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

रावसाहेब दानवे म्हणाले, “मागील दोन-तीन महिने या राज्याच्या राजकारणाची चर्चा ही केवळ संभाजीनगर जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा सुरू असल्याचे आपण पाहत आहोत. कधी नाही अशी घटना घडली आणि २०१९ मध्ये भाजपा-शिवसेनेच्या युतीला जनतेने कौल दिला होता. तुम्ही संदीपान भुमरे यांना आमदार म्हणून निवडून देऊन विधानसभेत पाठवलं होतं. खरंतर भाजपा-शिवसेना युतीचं सरकार यायला पाहिजे होतं. परंतु, दगाफटका झाला आमचं सरकार आलं नाही आणि ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो. त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून या राज्यात सरकार आलं. त्यामुळे केवळ निवडून आलेल्या आमदरांमध्ये आणि मंत्र्यांमध्येच नाराजी होती असं नाही, तर या राज्यातील जनतेच्या मनातही नाराजी होती. कारण, मतं मागितली आम्ही तुम्हाला दिली पण तुम्ही आम्हाला धोका दिला, असं त्यांचं म्हणणं होतं. जनतेची ही नाराजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाली तेव्हा दूर झाली आणि आज जनता आनंदी आहे. ”

याचबरोबर, “या मतदार संघाचा खासदार म्हणून मी तिसऱ्यांदा निवडून आलो, परंतु आतापर्यंत एवढी मोठी जनसभा पैठणमध्ये मी कधीही पाहीली नाही. ही पावती आहे की जो निर्णय एकनाथ शिंदे यांनी, संदीपान भुमरे यांनी घेतला किंवा या राज्यातील आमदारांनी घेतला, तो निर्णय सर्वांना मान्य आहे की नाही. सिल्लोडमध्ये देखील अशीच अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली होती. ही गर्दी पाहून शिवसेनेचे नेते आमच्यावर आता टीका करत आहेत. परंतु या टीकेला न घाबरता, न डगमगता आपण केवळ एकाच गोष्टीकडे पाहीलं पाहिजे की या राज्याचा विकास कोण करू शकतो, या राज्यातील शेतकऱ्यांना मदत कोण करू शकतो. पैठण, सिल्लोड मतदार संघासाठी कोट्यावंधीचा निधी देण्यात आलेला आहे. परंतु पुर्वीच्या सरकारमध्ये ते मंत्री असून देखील त्यांना मतदार संघात एक-एक रस्त्यासाठी कठीण जायचं. परंतु आता आपल्याला विकासाकडे पाहायचं आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापाला बळी पडू नका. ते गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत, यांच्या नावाने घोषणा देतात, यांनी खोके घेतले असं म्हणतात. परंतु आमचा पैठणचा बोक्या हा खोक्यावर जाणारा नाही याची आम्हाला खात्री आहे. म्हणून पुढील काळात या सरकारच्या काळात विकास करू.” असं म्हणत दानवे यांनी भाषण संपवलं.



Source link

Leave a Reply