Headlines

“तुमच्या धमक्यांना भीक घालणारी…”; नड्डांच्या ‘फक्त भाजपा टिकेल’वरुन शिवसेनेचा हल्लाबोल, गुजरात दंगल अन् मोदींचाही केला उल्लेख | Shivsena slams J P Nadda for his BJP supremacy remark scsg 91



गुजरातमधील दंगलीनंतर मोदींच्या पाठीशी केवळ शिवसेनाप्रमुख होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवण्यास निघालेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत? असा प्रश्न शिवसेनेनं विचारालाय. देशातून अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शिवसेना संपण्याच्या मार्गावर असून, इतर प्रादेशिक पक्षही लयाला जातील आणि फक्त भाजपा टिकेल, असा दावा नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून यावरुनच आता शिवसेनेनं भाजपा आणि नड्डा यांना लक्ष्य केलं आहे.

नक्की वाचा >> “३ कोटी रुपये रोख देऊन संजय राऊत यांनी अलिबागमध्ये…”; ईडीचा मोठा खुलासा; छापेमारीत हाती लागली महत्त्वाची कागदपत्रं

शिवसेनेने पंचवीसेक वर्षे भाजपास खांद्यावर घेऊन…
“भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ही व्यक्ती इतरांच्या तुलनेत बरी आहे, असा एकंदरीत समज होता. एक तर ते हिमाचलसारख्या शांत, थंड प्रदेशातून आलेले आहेत व अ. भा. विद्यार्थी परिषदेपासून ते समाजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे लोकशाहीचे भान त्यांना असावे, पण अखेर नड्डाही सब घोडे बारा टके या हिशेबानेच बोलू लागले आहेत,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. “नड्डा यांनी आता सांगितले आहे की, देशात फक्त भाजपाच टिकेल. शिवसेनेसह प्रादेशिक पक्ष संपतील. नड्डा यांचे विधान अहंकार व गर्वाने फुगलेले आहे. नड्डा यांनी शिवसेनेचा उल्लेख केला म्हणून सुरुवातीलाच सांगायला हवे. शिवसेनेला संपविण्याची भाषा करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. याच शिवसेनेने पंचवीसेक वर्षे भाजपास खांद्यावर घेऊन फिरवले. आज संबंधात दुरावा नक्कीच आहे, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावावरच महाराष्ट्रात आपण तरलात,” अशी आठवण शिवसेनेनं नड्डा यांना करुन दिलीय.

नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: ‘न्यायालयाने ढवळाढवळ करु नये’ या युक्तीवादावरुन सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला सुनावलं; म्हणाले, “तुम्ही न्यायालयात…”

जे.पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत?
“दुसरे म्हणजे संपूर्ण जग मोदी यांच्याविरोधात उभे ठाकले असताना हिंदुत्वासाठी म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच मोदींची पाठराखण करीत होते. गुजरातमधील दंगलीचे निमित्त करून मोदींना राजधर्माची आठवण करून देणारे त्यांच्याच पक्षाचे लोक होते. तेव्हा ‘राजधर्म वगैरे ठेवा बाजूला, हिंदू धर्म म्हणून मोदींना हात लावू नका, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उठवू नका,’ असे ठणकावून बोलणारे देशात एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालेले जे.पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत?” असा प्रश्नही शिवसेनेनं विचारलाय.

नक्की वाचा >> “…कारण पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो”; संजय राऊतांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत

कधी काळी काँग्रेसलाही वाटत होते की…
“नड्डा हे हुकूमशहांच्या चेल्याची भाषा बोलत आहेत व ही भाषा घराणेशाहीपेक्षा भयंकर आहे. भारत हा सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे व मोदी प्रधानजी आहेत. ते लोकशाही मार्गाने निवडून आले. लोकांचा पाठिंबा मिळाला तर त्यांनी पुन्हा निवडून यावे, पण आम्हीच निवडून येऊ व आमच्यासमोर विरोधी पक्षच शिल्लक ठेवणार नाही, ही भाषा लोकशाहीस मारक आहे. देशात सत्तेवर कोणी राहायचे हे लोकांनी ठरवायचे. कधी काळी काँग्रेसलाही वाटत होते की, देशात फक्त आम्हीच राहू, पण आज काय स्थिती आहे?” असं म्हणत शिवसेनेनं भाजपाला काँग्रेसचं उदाहरण दिलंय.

नक्की पाहा >> Photos: ८० लाख, नवनीत राणांचे प्रतिज्ञापत्र, लकडावाला अन् दाऊद; संजय राऊतांच्या अटकेनंतर राणा दाम्पत्य चर्चेत कारण…

याचा अर्थ मुकाबल्यास कोणीच उरले नाही व…
“७८ सालात काँग्रेसचा पराभव करून जनता पक्ष सत्तेवर आला. तेव्हाही ही घडी कायमची टिकेल असेच वातावरण होते. आज जनता पक्ष कोठे आहे? भाजपाही पाचोळ्यासारखा उडून गेलाच होता. अयोध्या आंदोलनाने व लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेने भाजपाला तारले. आज भाजपा मोदींच्या नेतृत्वाखाली मजबूत स्थितीत आहे, पण राजकारणाइतके चंचल काहीच नसते. लोकांचे मन कधी बदलेल त्याचा भरवसा नाही. हिंदू व मुसलमानांत सततची दरी निर्माण करायची, धर्मात वाद लावायचे हे सर्व निवडणुकीच्या ऐनभरात होत असते व त्यातून सध्याचा भाजपा सतत निवडणुका जिंकत आहे. याचा अर्थ मुकाबल्यास कोणीच उरले नाही व प्रादेशिक पक्षांचे पतन झाले असे नाही,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> “भारतात अनेकदा काही नेते, व्यक्ती म्हणजेच पक्ष असं समजण्याची चूक आपण करतो, जर…”; शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तिवाद

तुमच्या धमक्यांना भीक घालणारी…
“प. बंगाल, केरळ, बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा राज्यांत प्रादेशिक पक्ष मजबूत स्थितीत आहेत. शेवटी ही प्रादेशिक अस्मिता आहे व ती राहणारच. सगळेच काही तुमच्या मागे फरफटत जाणार नाहीत. पंजाब व दिल्लीत ‘आप’चे राज्य आहे. आम आदमी पक्ष आता नड्डांच्या हिमाचलात घुसला आहे. त्यामुळे हिमाचलात नड्डांची दमछाक होईल. महाराष्ट्रात शिवसेनेशी लढता येत नाही म्हणून त्यांनी ‘ईडी’ वगैरेंचा धाक दाखवून शिवसेना फोडली व हे फुटक्या कवडीचे फुटीर लोक खिशात ठेवून ते शिवसेनेस आव्हान देत आहेत. तुमच्या खिशातले फुटक्या कवडीचे लोक संपतील, पण बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा आकाशाला गवसणी घालेल. तुमच्या धमक्यांना भीक घालणारी शिवसेना नाही,” अशा इशाराच शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून नड्डांना दिलाय.

नक्की वाचा >> संजय राऊतांना ‘ईडी’कडून अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी आम्हाला पण तुरुंगात…”

लोकभावनांचा तरी कोठे आदर होतोय?
“‘संपवू’ वगैरे भाषा तुमच्या खिशातल्या फुटक्या कवडीच्यांना करा. नड्डा यांची भाषा लोकशाहीसाठी मारक आहे, पण ते ज्यांच्या सावलीत वावरत आहेत ते पाहता त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी? एक चांगला माणूसही वाया गेला याचेच दुःख जास्त आहे. आजचा भाजपाचा वंश हा खरेच खऱ्या भाजपाच्या गर्भातून वाढला आहे काय? महाराष्ट्रापासून देशात सर्वत्र काँग्रेससह अनेक पक्ष फोडूनच भाजपाची वाढ झाली. म्हणजे भाजपाचे डोके असले तरी हात, पाय, नाक, कान वगैरे सगळे दुसऱ्यांचे आहे व शिवणकाम करून ते शरीर जुळवले आहे. तुमच्याच वंशवेलीचा पत्ता नाही आणि तुम्ही देशातील इतर पक्षांना संपवायची भाषा करताय. कोणी राहायचे व कोणी जायचे हे लोकांना ठरवू द्या, पण लोकभावनांचा तरी कोठे आदर होतोय?” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> “ईडीच्या भीतीनेच शिंदे भाजपासोबत”; शिवसेनेचा हल्लाबोल, म्हणाले, “भाजपाने शिंदेंच्या मदतीने शिवसेना संपवण्याचा डाव टाकला पण…”

‘ईव्हीएम’वरुनही शिवसेनेचा टोला
“लोकांचा आग्रह आहे निवडणुका ‘ईव्हीएम’ने न करता मतपत्रिकेने व्हाव्यात. कारण ‘ईव्हीएम’वर लोकांचा विश्वास नाही आणि मतपत्रिकेवर भाजपाचा विश्वास नाही. जे आपल्या विरोधात आहेत त्यांना ‘ईडी’ अधिकाऱ्यांना हाताशी धरून तुरुंगात टाकायचे व विरोधकांतील जे कलंकित शरण येतील, त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुऊन आपल्या गाठीशी बांधायचे, ही काय लोकशाही म्हणायची? राजकारणात फक्त आम्ही आणि आम्हीच ही भाषा हुकूमशाहीची आहे. एकाधिकारशाहीची आहे. ही जनमानी नसून मनमानी आहे. जे जे नजरेस येईल त्या सगळ्यांचा मालक मीच आहे या विचाराने भाजपा वागत असेल तर त्यांचा आणीबाणीविरुद्धचा लढा एक ढोंग होते असेच मानावे लागेल,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.

नक्की वाचा >> “राऊत असो, शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, सर्वांनी…”; राऊतांनंतर ‘हा’ नेता तुरुंगात जाणार असल्याचा किरीट सोमय्यांचा दावा

कावळ्याच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत
“भाजपाचे वाढणारे बळ कृत्रिम आहे. इतर पक्षांचे सदस्य व नेते फोडण्यासाठी भाजपा फक्त दडपण आणि दहशत याचाच वापर करीत आहे, असे नव्हे तर या दडपशाहीला किंवा प्रलोभनांना बळी न पडलेल्यांना सरळ तुरुंगाची वाट दाखवली जात आहे. तरीही या सगळ्याला भीक न घालता प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक पक्ष उभे आहेत व लढत आहेत. कारण त्यांची नाळ पक्की आहे. जे. पी. नड्डा यांनी हे समजून घेतले पाहिजे. नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की, भाजपाच राहील व बाकीचे सगळे संपतील. मऱ्हाटीत एक म्हण आहे ती म्हणजे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही! नड्डा साहेबांना या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. दुसरे असे की, भाजपाने खोटा खोटा का होईना, गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे. त्यामुळे कावळ्याच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल. कावळे मात्र नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.



Source link

Leave a Reply