“…तर आम्हीपण तुमच्या गटात येतो” ठाकरे गटातील आमदारांच्या रात्रीच्या फोनबाबत शहाजीबापू पाटलांचा गौप्यस्फोट | shahajibapu patil on thackeray group MLA about night call we will join shinde group jalgaon speech rmm 97



शिंदे गटाचे समर्थक शहाजीबापू पाटील यांनी जळगाव येथील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसह ठाकरे गटाच्या आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटातील आमदार आम्हाला रात्री फोन करतात आणि न्यायालयाच्या निकालानंतर आम्हीही तुमच्या गटात येतो असं म्हणतात, असा खुलासा शहाजीबापू पाटलांनी केला आहे. आम्ही शिवसेनेचं काहीही वाटोळं केलं नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या जागी आम्ही शिवसेनेचेच नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आहे, असंही पाटील म्हणाले.

बंडखोर आमदारांचा उल्लेख ‘गद्दार’ करण्यावरूनही शहाजीबापू पाटलांनी विरोधकांवर टीकास्र सोडलं आहे. आम्ही ५० जण बाजीगर होतो. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायच्या भानगडीत पडू नका. आम्ही बाजीगर होतो, जातीवंत होतो, मरणाला न घाबरणाऱ्या आमच्या औलादी होत्या. त्यामुळे आमदारक्या आमच्यासाठी गौण आहेत. माणसानं प्रामाणिक असावं, हा खरा प्रश्न आहे. आमदारासाठी सगळ्यात आधी जनता असते, त्यानंतर नेता आणि मग पक्ष. सगळ्यात आधी जनतेशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, कारण याच जनतेनं तुम्हाला मुंबईला पाठवलेलं असतं.

हेही वाचा- “…म्हणून शिवाजी पार्कवर भाषण करण्यास गुलाबराव पाटलांवर बंदी घातली” एकनाथ शिंदेंचा खुलासा, म्हणाले…

जनताच तुमच्या पाठीशी नसेल तर शहाजीबापू पाटीलही मुंबईला जाऊ शकत नाही. आम्हाला घरात बसावं लागलं असतं. तुम्हीच आम्हाला मुंबईला पाठवलं. त्यामुळे तुमच्या सुख-दु:खाशी आमची नाळ जोडली आहे. तुमचे प्रश्न सोडण्यासाठीच आम्ही हे पाऊल टाकलं आहे. याकडे मोठ्या अंतकरणाने आणि मोठ्या मनाने बघा, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

हेही वाचा- “हा बाबा पहाटेच मंत्रालयात येऊन…” अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत शहाजीबापू पाटलांची जोरदार टीका!

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही शिवसेनेचं काहीही वाटोळं केलं नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या जागी आम्ही शिवसेनेच्याच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं आहे. त्यामुळे आता कुणाची खरी शिवसेना? कुणाचा दसरा मेळावा? यावरून कशाला भांडत आहात. ५० आमदार एका बाजुला आहेत आणि १३-१४ आमदार तुमच्याकडे आहेत. त्यातले सात-आठजण आम्हाला रात्री फोन करतात, न्यायालयाचा निकाल लागला की आम्हीपण तुमच्या गटात येतो, असं म्हणतात. ते केवळ न्यायालयाच्या निकालाची वाट बघत आहेत, असा गौप्यस्फोट शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply