Headlines

“…त्यावेळी खऱ्या अर्थाने ‘इनकमिंग’ पाहायला मिळेल”, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचं वक्तव्य | Tanaji Sawant claim many leaders will join Eknath Shinde group in upcoming days

[ad_1]

राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी लवकरच शिंदे गटात मोठ्या संख्येने राजकीय नेते सहभागी होतील असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या हस्ते बुबने चाळ येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांचं सोलापूर शहरात जंगी स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादी युवकचे सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रियदर्शन साठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेशही केला. हाच धागा पकडून त्यांनी आगामी काळात शिंदे गटात मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ होईल, असं सूचक विधान केलं.

तानाजी सावंत म्हणाले, “महानगरपालिकेचे ढोल अजून वाजायचे आहेत. १७ सप्टेंबरला मराठा क्रांती मुक्तीसंग्राम आहे. त्यानंतर एक पूर्ण दिवस मी सोलापूरमध्ये असेन. त्यावेळी खऱ्या अर्थाने ‘इनकमिंग’ पाहायला मिळेल. महानगरपालिकेचं बिगुल जेव्हा वाजेल तेव्हा वाजेल, पण सध्या आम्ही मागील अडीच वर्षात जो तोटा झालाय तो भरून काढायचा आहे.”

“ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र पाच वर्षे मागे गेला”

“या काळात महाराष्ट्र पाच वर्षे मागे गेला होता, प्रगती खुंटली होती. २०२४ पर्यंत महाराष्ट्र परत पुढच्या पाच वर्षांसाठी आघाडीवर नेऊन ठेवायचा हे ध्येय आम्ही बाळगलं आहे. त्यासाठी प्रत्येकावर जबाबदारी देण्यात आली आहे,” असं तानाजी सावंत यांनी सांगितलं.

“शिंदे गट, अमूक गट असं काही राहिलेलं नाही”

शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटावर बोलताना सावंत म्हणाले, “शिंदे गट, अमूक गट असं काही राहिलेलं नाही. शिवसेना आमचीच आहे. ही एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, आपल्या सर्वांची शिवसेना आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. त्यांनी हिंदुत्वाचा विचार सर्वांना दिला. तो विचार कोणीतरी सोडला होता, तोच विचार घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत आहोत. हेच विचार घेऊन आम्ही सर्व जनतेची सेवा करू.”

“आम्ही ४० लोकांनी उठाव केला, त्याला भाजपाने चांगलं सहकार्य केलं”

“सरकार येऊन ६० दिवस झालेत आणि मंत्रीमंडळ तयार होऊन १५ दिवस होत आले आहेत. तुम्हाला आता खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या मनातील हुंकार दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी ताकदीने निर्णय घेतला आणि आम्ही ४० लोकांनी उठाव केला. त्याला ३० वर्षे साथ असलेल्या भाजपाने चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे महाराष्ट्राला न भूतो न भविष्यते यश पाहायला मिळालं,” असं सावंत यांनी सांगितलं.

हेही वाचा : अमित शहा यांना मुंबई महापालिका निवडणूक तयारीसाठी यावे लागते हा शिवसेनेचा नैतिक विजय ; अंबादास दानवे यांचे वक्तव्य

“२०२४ मध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”

“आता मागील अडीच वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढून २०२४ मध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी जनतेच्या आशीर्वादीच गरज आहे. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपा, शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात यश मिळवू,” असंही त्यांनी नमूद केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *