Headlines

स्वत:ची काळजी घ्या, कोरोना विषाणूला घाबरु नका!


समाजात नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषाणूंची दहशत असते. अलिकडे 152 देशांमध्ये कोरोना व्हायरसची दहशत पसरलेली आहे.

विषाणूंचा समुह म्हणजे कोरोना व्हायरस. हा माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. माणसांमध्ये आढळलेल्या अनेक विषाणूंपेक्षा वेगळा आहे म्हणून याला नोवेल कोरोना विषाणू असे म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग होत असला तरी यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे. कोव्हीड-19 असे त्याला नाव दिले आहे. हा आजार साध्या ल्यू सारखा आहे. बाधीत रुग्णाच्या सहवासात आल्याने सर्वच वयोगटातील रुग्णांना लागण होण्याचा धोका असतो. आजच्या घडीला 60 वर्ष वयोगटापुढील व्यक्ती, मधुमेह, हदयरोग, कॅन्सर, फुप्फुसाचे आजार, रक्तदाब असणा-यांना बाधा होण्याची शक्यता आधिक आहे. याशिवाय ज्यांनी कोविडचे लसीकरण केले, अशा व्यक्तींना लागण होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत कमी असतो.

हा विषाणू प्रामुख्‍याने खोकतांना आणि शिंकतांना उडणा-या थेंबातून पसरतो. अशा थेंबातून 3 फुटापर्यंत हा विषाणू पोहोचू शकतो. त्यामुळे एक दुस-यांशी संवाद साधतांना 3 फुट अंतराच्या पूढे राहणे योग्य ठरते. हा विषाणू श्वसन मार्गाव्दारे घशातून फुप्फुसात जातो आणि नंतर रुग्णाच्या गंभीर स्थितीत न्युमोनिया (श्वसनदाह) होऊन श्वासाला त्रास होऊ लागतो. विषाणू 14 दिवस जिवंत राहतो. या 14 दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखव होणे, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास, ही लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा. डॉक्टरांना संशयीत लक्षणे आढळल्यास चाचणी करुन घेतात आणि मोफत औषधोपचार करतात.

या आजाराकरिता विशेष औषधे नाहीत. ताप, खोकला आणि घसादुखी याकरिता जी औषधे दिली जातात तीच औषधे या आजाराकरिता दिली जातात. श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यास, श्वास ऑक्सीजनची पातळी कमी झाल्यास ऑक्सीजन थेरपी किंवा अति गंभीर अवस्थेत व्हेंटिलेटरचा वापर करतात. कोरोनामुळे शक्यतोवर मृत्यू होत नाही, मात्र कोरोना आजाराबरोबर वयस्क नागरिक, मधूमेह, किडनी फेल असे आजार असेल तर अशा दोन्ही आजारांचा एकत्रित परिणाम होऊन मृत्यू होऊ शकतो.

आता आपण कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या तिस-या लाटेच्या मार्गावर आहोत. जर वेळीच उपाय योजना केली नाही तर तिस-या लाटेत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे संकट टाळण्यासाठी लोकांनी स्वत:हून दूर राहायला पाहिजे. एकमेकांच्या संपर्कातून संसर्गाची व्याप्ती वाढत जाते आणि अशा वेळी परिस्थिती आटोक्यात आणने सहज शक्य नसते. मागील दोन टप्प्यांमधील कोविड आजारांचे अनुभव खास करुन समाजातील सर्व नागरिकांना आलेले आहेत. अनेकांच्या कुटुंबातील, आजूबाजूचे नागरिक बाधीत झाले असतील. काहींना रुग्णालयात बेड मिळू शकत नव्हते. काहीं उपचार मिळून घरी परतले असतील तर काहींना रुग्णालयातच अखेरचा श्वास घ्यावा लागला. कुटुंबियांना अंतिम क्रियेसाठी पार्थिव देखील मिळू शकले नाही. शासकीय यंत्रणेवर फार मोठा भार आला. शाळा बंद पडल्या. सर्वांना घराबाहेर पडणे अडचणीचे झाले. त्यामुळे लहान मुले, किशोरवयीन मुले मोबाईल वरील सोशल मिडियाला बळी पडली. अनेक जण मानसीक आजाराला बळी पडले.

अर्थव्यवस्थेवरील परिणाम

पहिल्या टप्प्याचा परिणाम सर्वाना माहित आहेच. तात्काळ झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना हातचे काम सोडून कसे बसे गावाकडे वळावे लागले. या दरम्यान अनेक संकटांना सामना करावा लागला. अनेकांना प्राण गमवावे लागले. उद्योग धंदे बंद झाले. लोकांना उपासमार सहन करावी लागली. शासकीय तिजारीवरील भार वाढला. परिणामी दरडोई उत्पन्न घटले. अनेक सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न निर्माण झाले. अशा कितीतरी दुष्परिणामांना समाजाला तोंड द्यावे लागले.

प्रतिबंध

याआजाराला प्रतिबंध करण्यासस्वत:चीकाळजीघेणेहाअतिशयमहत्वाचाभागआहे.

हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आजार होऊच नये यासाठी ख्‍बरदारी घ्यावी. ज्या रुग्णांचे कोविड लसीकरण झाले नव्हते, अशा रुग्णांना तीव्र स्वरुपाचे लक्षणे आढळून येत आहेत. कोविडच्या तीसऱ्या लाटेच्या लढाईसाठी सर्वांनी सुरक्षा म्हणून कोविड लसीकरण 100 टक्के करुन घ्यावे. तसेच शाळेतील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांचे 100 टक्के लसीकरण करुन या कोविडच्या युध्दात प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला सहाकर्य करावे. सध्या 93 टक्के लोकांनी लसीकरणाची पहिली मात्रा घेतली आहे तर 60 टक्के लोकांनी दुसरी मात्रा घेतली आहे.

समाजात अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे लसीचा साठा उपलब्ध असताना सुध्दा अनेक व्यक्ती कोविड लसीकरण करुन घेत नाहीत. मात्र अलिकडे अशाच लोकांना लागन होण्याचे प्रमाण जास्त असलेले दिसून येत आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी स्वत: सोबतच इतरांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून स्वयंस्फुर्तीने कोविड लसीकरण करुन घ्यावे आणि इतरांना करण्यास प्रवृत्त करावे. प्रशासनाव्दारे संशयीत रुग्णांच्या चाचण्या वाढविण्यात आलेल्या आहेत. ट्रॅकींग, ट्रेसींग आणि टेस्टींग यावर भर देण्यात आलेला आहे. तरीही लसीकरण करुन घेण्यावर भर द्यायचा आहे, याकरिता वेगवेगळया माध्यमांव्दारे प्रशासनामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.

एकदा कोरोना झालेल्यांनाही ओमायक्रॉनची बाधा होणार काय?

अलिकडे भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन या नविन व्हेरिएंटची लागण मोठया प्रमाणावर होत आहे. महाराष्ट्रात मुंबईसह इतर अनेक ठिकाणी ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला दिसून येत आहे.

  • कोविड आाजार होऊन गेल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती वाढलेली असते. अशा स्थितीत ओमायक्रॉनच्या आधिच्या व्हेरियंटची बाधा होण्याची शक्यता फार कमी असते. तरीही बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही ती डेल्टा व्हेरीएंट पेक्षाही 5.4 पट अधिक आहे.
  • हा धोका टाळण्यासाठी बुस्टर डोस घेणे गरजेचे आहे. सध्या फ्रंट लाईन वर्कर, तातडीच्या सेवा देणारे अधिकारी कर्मचारी आणि 60 वर्षा वरील नागरिक यांना प्रथम बुस्टर डोस देण्यात येत आहे. तसेच ज्यांना दोन डोस घेऊन 9 महिने झाले आहेत असे व्यक्ती बुस्टर डोस घेण्यास पात्र आहेत.

संसर्ग बहुतांश सार्वजनिक ठिकाणी होतो. हाताचा संपर्क, नाक, तोंडाशी आल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे वारंवार साबणाने हात धुवावेत तसेच शिंकताना व खोकताना रुमाल नाक-तोंडावर वापरावा. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावावा. ज्यांना विषाणूची बाधा झाली आहे किंवा जे त्यावर उपचार करीत आहेत त्यांनी मास्क लावावा. हे कटाक्षाने पाळावे. सामाजिक आरोग्यासाठी समोरील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत, आपण सर्वांनी हे पाळले पाहिजे. टिश्यू पेपर वापरलात तर रस्त्यावर उघडयावर टाकू नका तर तो कच-याच्या पेटीत टाका, चौकात किंवा रस्त्यावर थुंकू नका. हे लोक हिताचे ठरेल.

हा विषाणू टाळण्यासाठी वारंवार साबनाने हात स्वच्छ करणे उत्तम ठरेल, साबणातील लिपिडमुळे विषाणूचे आवरण फुटते आणि 20 सेकंदात विषाणू मरतो. याकरिता कोणतीही साबण चालेल. साबनाचा वापर करणे शक्य होत नसल्यास सॅनिटायझरचा वापर करावा. वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. या कालावधीत 60 पेक्षा अधिक वय असणा-या नागरिकांनी, तसेच मधुमेही, गर्भवती माता, दोन वर्षाखालील बालके, किडणीचे आजार असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी. गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक कार्यक्रम आणि रेल्वे, बस, विमान या माध्यमातून होणारा प्रवास टाळावे कारण कोण कुठून आले हे कळत नाही, परदेशातून येणा-या नागरिकांसाठी 14 दिवस वेगळे ठेवले जाणार आहे.

सध्या कोरोना विषाणूची स्थिती अत्यंत बिकट असली तरी घाबरुन जायचे काही कारण नाही, प्रत्येक नागरिकांनी वैयक्तिक गरज समजून वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ उत्तम ठेवण्यास वरील प्रमाणे प्रयत्न केल्यास नक्कीच आपणा सर्वांना कोरोना विषाणूवर मात करता येईल, आणि सामाजिक स्वास्थ्य उत्तम ठेवता येईल.

डॉ. श्रीराम गोगुलवार

प्राचार्य

आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर

Source link

Leave a Reply