[ad_1]
शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल असं भाकीत वर्तवलं असल्याने चर्चा रंगली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांचा हा दावा फेटाळला असून त्यांना स्वप्नातच राहू दे असा टोला लगावला होता. त्यावर संजय राऊतांनी दिल्लीत प्रसारमाध्मयांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिदेंना ज्येष्ठ नेत्यांकडून निष्ठेची शिकवण घेण्याचा सल्लाही दिली आहे.
संजय राऊतांनी काय भाकीत वर्तवलं होतं?
“सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील हे नक्की आहे. बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं, पण यानंतर ते आपल्याला शिवसैनिक म्हणू शकणार नाहीत. दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही,” असं भाकीत संजय राऊतांनी वर्तवलं होतं.
Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…
एकनाथ शिंदेंनी काय उत्तर दिलं होतं?
एकनाथ शिंदेंना याबद्दल विचारण्यात आलं असता ते टोला लगावत म्हणाले “ते स्वप्नं पाहत असतात, त्यांना स्वप्नातच राहू द्या. राज्यामध्ये १६६ लोकांचं सरकार आहे. लोकसभेतही १२ खासदारांनी अध्यक्षांना पत्र दिलं आहे. दोन्ही सभागृहात आमच्याकडे बहुमत असून सरकार मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या”.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “त्यांच्याकडून जरा निष्ठेच्या…”
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं “ओबीसी समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित होतं, त्यामुळे मी तीन-चार वेळा दिल्लीला गेलो होतो. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञ, वकील, वरिष्ठ विधिज्ञ यांच्या बैठका घेतल्या. त्यातून या राज्यातील ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम सरकारने केलं आहे. याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचेही आभार मानले आहेत”.
संजय राऊतांचं प्रत्युत्तर –
“सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही या मताशी मी ठाम आहे. ते स्वप्न असू शकतं. काहींना तर कोणत्याही मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. “आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेनेत सत्ता आणायची आहे. पण ही सत्ता मिळेल त्या मार्गाने आणायची नाही. लोकशाही मार्गाने आम्ही सत्ता आणू आणि ती वेळ लवकरच येईल,” असंही ते म्हणाले.
ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीवरुन टोला –
“मनोहर जोशी आणि लीलाधर डाके हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक कडवट शिवसैनिक म्हणून कठीण प्रसंगात ठामपणे उभे राहिले. डाके आणि जोशी सरांकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अनेक वादळात, संकटात शिवसेनाप्रमुख, शिवसेनेबरोबर ते निष्ठेने राहिले. अशा कडवट शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे. नक्कीच यातून त्यांना प्रेरणा आणि बोध मिळेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“मनोहर जोशी, लीलाधर डाके पक्षाचे निष्ठावान नेते आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं फार आहे. मुख्यमंत्री अशा नेत्यांच्या भेटीसाठी जात असतील तर निष्ठेच्या गोष्टीही शिकल्या पाहिजेत,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
[ad_2]