शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या वादावरील सुनावणीसंदर्भात प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केलाय. पत्रकारांशी संवाद साधताना सामंत यांनी आमची बाजू वकील हरीस साळवे यांनी अगदी योग्य पद्धतीने मांडल्याचं नमूद केलं आहे. इतकच नाही तर आम्ही सुरुवातीपासूनच हे प्रकरण पक्षांतर कायद्याअंतर्गत येत नसल्याचं आम्ही म्हणत होतो असंही सामंत म्हणालेत.
“आठ ऑगस्टला सुनावणी आहे. जे वृत्तवाहिन्यांवरुन दाखवण्यात आलं त्यात स्पष्ट असं सांगितलं आहे की निवडणूक आयोगाकडे जी सुनावणी सुरु आहे त्याला कुठं सर्वोच्च न्यायालयाने आडकाठी केली असं मला वाटत नाही,” असं मत उदय सामंत यांनी नोंदवलं आहे. “मात्र निर्णयापर्यंत येऊ नये अशापद्धतीची भूमिका न्यायालयाने मांडली आहे,” असंही सामंत म्हणालेत. याशिवाय सामंत यांनी सोमवारी हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही याबद्दल निर्णय होणार असल्याचे न्यायालयाने सांगितल्याचंही नमूद केलं. “हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही याचा निर्णय सोमवारी घेणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे,” असं सामंत म्हणाले.
“आमचे वकील साळवे यांनी जी भूमिका मांडलीय ती महत्वाची आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की आम्ही शिवसेना सोडून कुठेही गेलेलो नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही पक्षांतर्गत आवाज उठवला आहे. हे असं करणं पक्षांतरण कायद्याअंतर्गत येत नाही,” असं सामंत यांनी स्पष्ट केलं. तसेच आमची भूमिका वकील हरीश साळवे यांनी मांडल्याचंही सामंत म्हणाले. “आम्ही शिवसेना सोडली नाही तर पक्षांतरण कायदा लागू होणार नाही ही आमची भूमिका योग्य प्रकारे आमच्या वकिलांनी न्यायालयात मांडली असून त्याच्याशी आम्ही सहमत आहोत,” असं सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
त्याचप्रमाणे हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागेल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. “सोमवारच्या निकालाकडे आमच्या सर्वांचं लक्ष आहे. आमची न्यायालयीन बाजू अधिक भक्कम आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल असं आमचं म्हणणं आहे, असंही सामंत म्हणाले.