[ad_1]
नागपूर, दि. 15: गेल्या आठवड्यात नागपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी बांधवांनी या संकटाचा धैर्याने सामना करावा. राज्य शासन तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, लवकरच मदत देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज शेतकऱ्यांना दिले. प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर गारपीट झालेल्या नागपूर ग्रामीणमधील बैलवाडा, गुमथळा, गुमथी तर रामटेक तालुक्यातील दाहोदा, जमुनिया, घोटी, आणि पारशिवनी तालुक्यातील करंभाड, इटगाव आणि लोणखैरी या गावांना भेटी देत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲङ आशिष जैस्वाल, आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी आर. विमला, पोलीस अधीक्षक विजयकुमार कुमार, नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, रामटेकच्या वंदना विरानी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, तहसीलदार आशिष वानखेडे, रामटेकचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्यासह कृषि व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. राऊत यांनी बैलवाडा येथील जगन्नाथ शेषराव जुमडे यांच्या शेतात गारपीटीने झालेल्या दोन एकरातील वाल आणि पालक भाजीची पाहणी करत दौऱ्याला सुरुवात केली. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कृषि व महसूल विभागाकडून जवळपास पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी सौर पॅनल योजनांच्या माध्यमातून दिवसा पिकांना पाणी देता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना अंधारात पिकांना पाणी देण्याची समस्या उदभवणार नसल्याचे सांगतानाच या संकटाचा सर्वजण सामना करुयात, असा आशावादही त्यांनी पेरला.
जिल्ह्यातील गुमथी येथील अशोक मोरे, दाहोदा येथील रेखाताई कुमरे यांच्या दोन एकर शेतातील विक्रीस आलेले टमाटे पिक गारपिटीने हातचे गेले आहे. तसेच देवराव सकरु उईके यांच्या संत्रा, वांगे, काजूची झाडे, कापूस, तूर, गहू, उन्हाळी सोयाबीनचे नुकसान झाले असून, भाजीपाला पिकांमध्ये फुलकोबी, पानकोबी, मेथी, टमाटे, वाल, चवळी, पालक, कांदा, हरभरा आदी पिकांची मोठी नासाडी झाली आहे, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले. कृषि व महसूल विभागाकडून पंचनामे सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
[ad_2]