बार्शी /प्रतिनिधी – सर्वसाधारण सभेमध्ये चुकीचा आणि बेकायदेशीर केलेला ३७ चा प्रस्ताव रद्द करण्यासाठी नगराध्यक्ष बार्शी नगरपरिषद यांनी पुन्हा सर्वसाधारण सभा घेऊन तो रद्द करून शासनाकडे पाठवावा अशी मागणी करत प्रहार संघटना, स्वराज इंडिया, इंक्रेडिबल समाजसेवा ग्रुप आणि मानवीहक्क संरक्षण व जागृती या संघटनांनी बार्शी नगरपरिषदेसमोर सत्याग्रह आंदोलन केले. पोस्ट ऑफिस चौकातील जागेमध्ये केलेला चुकीचा ठराव पास रद्द करावा अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल.
तेथील रहिवासी नागरिकांना त्याच ठिकाणी घर द्यावे अशा मागण्या मांडत, गरिबांचे घर उध्वस्त करून मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याचा प्रकार नगराध्यक्ष असिफ तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील व सर्व नगरसेवक करत आहेत असा आरोप आंदोलकांनी करत,बार्शी मध्ये हुकुमशाही आणि दडपशाही चालणार नसल्याच्या घोषणा आंदोलनात देण्यात आल्या.
संविधान मधील ७३ वी घटनादुरुस्ती व १२ वी अनुसूची नुसार कुठलाही प्रस्ताव किंवा ठराव मंजूर करण्यापूर्वी जनतेला विश्वासात घेऊन त्याच्या सभा घेऊन ठराव मंजूर करावयाचा असतो, असे प्रतिपादन आंदोलनामध्ये बोलताना इंक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचे अस्लम बागवान यांनी केले.
आंदोलन स्थळी येऊन मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी आंदोलन करणाऱ्या जनतेशी संवाद साधला व आंदोलना मधील नऊ जणांची समिती करून त्यांच्याशी प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलनकर्ते यांना दिले.
असंविधानिक ठराव रद्द करा, पोस्ट ऑफिस समोरील बहुजन/गरिबांचे घर त्याच जागेत पुनर्वसन करा व संविधान अनुच्छेद 19 नुसार “घर बचाव – घर बनाव समिती” च्या प्रश्नांशी मुख्याधिकारी, बार्शी नगर परिषद बार्शी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करा आशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यावेळी स्वराज अधियानाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मानव कांबळे, जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वय पश्चिम महाराष्ट्र समन्वयक इब्राहीम खान, इंक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अस्लम इसाक बागवान जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वय चे महाराष्ट्र समन्वयक युवराज गटकळ, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजीवनीताई बारुंगुळे, मनीष देशपांडे यांचेसह विनोद नवगण, दिनेश पवार, अमोल जाधव, सागर नवगण आणि लहान मुलांसह महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या.