[ad_1]
कराड : खासदार संजय राऊत यांच्या चुकीच्या गोष्टी बाहेर आल्या म्हणून त्याचे खापर एखाद्या राजकीय पक्षावर फोडणे चुकीचे असल्याचे शिवसेना आमदार व राज्याचे माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईचे समर्थन करताना, शंभूराज देसाई यांनी खासदार राऊत यांना लक्ष्य केले. सक्तवसुली संचालनालय (ईडी) ही स्वायत्त यंत्रणा असून, तिला घटनेने, कायद्याने स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत. ‘ईडी’सारख्या यंत्रणांच्या कारवायात राजकीय पक्षाचा वा सरकारचा हस्तक्षेप नसतो असा दावा देसाई यांनी केला. तरी आपल्यावरील आरोपांमध्ये सकृतदर्शनी तथ्य आढळत असल्याचे लक्षात आल्यानंतर संजय राऊत हे त्याचे खापर एखाद्या राजकीय पक्षावर फोडत असल्याची बाब निश्चित चुकीची आहे. आरोपांमध्ये तथ्य नसेलतर चौकशीअंती ते सिद्ध होईल. मग एवढं घाबरायचं कशासाठी असा सवाल शंभूराज यांनी केला. ‘ईडी’ने ताब्यात घेतल्यानंतर राऊत हे एखाद्या युद्धाला निघाले असल्याचे भासवत होते. एका गैरव्यवहार प्रकरणी आपल्याला ताब्यात घेतल्याचे राऊत विसरले होते. हात हालवून त्यांनी नौटंकी आणि उसने अवसान आणण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही शंभूराज देसाई यांनी केली.
खासदार राऊत यांच्या हेकेखोरपणामुळे शिवसेनेवर काय वेळ आली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. राऊत यांच्या बोलण्या, वागण्याने शिवसेना संपवण्याचे काम चोखपणे बजावले आहे. आणि हेच राऊत आता मी शिवसेना सोडणार नाही असे म्हणत असतील तर त्यांना कोण शिवसेना सोडा म्हणतयं असाही सवाल शंभूराज यांनी या वेळी उपस्थित केला.
[ad_2]