Headlines

सांगलीत भाजपकडून जुने हिशेब चुकते



दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : महापौर निवडीवेळी भाजपमध्ये फूट पाडून भाजपला सत्तेवरून पायउतार करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव भाजपने स्थायी सभापती निवडीवेळी उलटवून सव्याज परतफेड केली आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचेच बहुमत असले तरी राष्ट्रवादीचे दोन सदस्य सभापती निवडीवेळी गैरहजर राहिल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आता दुरावा निर्माण झाल्याचे चित्र निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. यामुळे वर्षांवर आलेल्या निवडणुका दोन्ही काँग्रेसच्या दृष्टीने सोप्या तर नसणारच पण स्वअस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या ठरतील याची चुणूक स्थायी सभापती निवडीवेळी झालेल्या घडामोडीने दिली आहे.

दीड वर्षांपूर्वी झालेल्या महापौर निवडीवेळी भाजपच्या तंबूतील सात सदस्य फोडून काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादीने सत्ता बदल घडवून आणला. याला केवळ महापालिकेतील सत्तासंघर्षच कारणीभूत होता असे नाही, तर राज्यामध्ये झालेला सत्ताबदल हे मूळ कारण होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे महापालिकेत भाजपला सत्तेवरून पायउतार करण्यास पोषक स्थिती निर्माण झाली होती. याचा नेमका फायदा उठवत राष्ट्रवादीने संख्याबळ कमी असताना विरोधकांच्या तंबूतील कुमक आणण्याच्या अटीवर महापौर पदावर दावा सांगून पद पटकावले. मात्र, गेल्या दीड वर्षांत केवळ उपमहापौर पद काँग्रेसच्या वाटय़ाला आले असताना स्थायी सभापतीची संधी काँग्रेसला देऊ या गाजरावर राष्ट्रवादी सत्ता भोगत आहे. याचे शल्य काँग्रेसला अगोदरपासून आहेच, मात्र बोलता येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. सत्तेत सहभागी असतानाही निर्णय प्रक्रियेमध्ये काँग्रेसला फारसे स्थान नाही. घनकचरा प्रकल्पामध्येही काँग्रेसला फारसे महत्त्व का दिले जात नाही याचे शल्य तर आहेच, पण पक्षाचे नेते सांगतात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंगतीला बसण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. त्यात काँग्रेस अंतर्गत तीन गट असल्याने याचा नेमका फायदा राष्ट्रवादी घेत आली आहे. याचा फटका पक्षास तर बसतोच आहे, पण सदस्यांची नाराजीही वेळोवेळी डोके वर काढत आहे. महापौर पदाची होत असलेली मागणीही त्याचाच एक भाग आहे. राष्ट्रवादीने महापौर पदावर हक्क सांगत असताना उपमहापौर आणि स्थायी सभापती पद काँग्रेसला देऊ असा शब्द दिला होता. उपमहापौरांची निवड महापौराबरोबरच झाल्याने त्यावेळी एवढा एकाच वेळी ही संधी काँग्रेसला मिळाली. मात्र, स्थायी सभापती निवडीवेळी भाजपमधील असंतुष्टांना आपल्याकडे खेचण्याचे काम काँग्रेसलाच करावे लागणार होते. मात्र, यासाठी लागणारी ताकद काँग्रेस नेत्यांकडून मिळू शकली नाही हीसुध्दा वस्तुस्थिती आहे.

स्थायी समितीमध्ये भाजपचे ९ तर काँग्रेसचे ४ आणि राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. बुधवारी सभापती निवडीवेळी आघाडीची सर्व मते जरी काँग्रेसचे उमेदवार संतोष पाटील यांना पडली असती तरी भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांचाच सभापती होणार हे कागदोपत्री स्पष्ट आहे. मात्र भाजपमधील उणिवा शोधून वर्मी घाव घालून जसे राष्ट्रवादीने महापौर पद पटकावले तसे काँग्रेसला करता आले नाही. काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला याचे शल्य काँग्रेसला फारसे नाही, कारण कागदोपत्री संख्येचे गणित जमतच नव्हते. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्या संगीता हारगे आणि पवित्रा केरीपाळे या दोन सदस्या जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्या. जेणेकरून राष्ट्रवादी जर फोडाफोडी करू शकते तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो हेच भाजपला दाखवायचे होते.

आता या दोन सदस्यांना अपात्रतेबाबत कारणे दाखवा नोटिसा राष्ट्रवादीने बजावल्या आहेत. हा प्रकार म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असाच आहे. भाजपने कारवाईचा प्रस्ताव दिलेल्या नगरसेवकांचा गेले दीड वर्ष झाले निकाल लागलेला नाही, आता या दोन सदस्यांबाबत तात्काळ निर्णय होणेही अपेक्षित नाही. वर्षांवर निवडणुका आल्या आहेत, तोपर्यंत आयर्विन पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे.

स्थायी सदस्य पदाची श्रीमती हारगे व नर्गिस सय्यद यांना एक वर्षांसाठी संधी देण्यात आली होती. मुदत संपताच दोघींना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. मात्र, हारगे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर सय्यद यांनी राजीनामा दिला असतानाही त्यांना पुन्हा संधी देण्यात आली. पक्षांतर्गत गटबाजीतून हे घडले.

स्थायी समितीमध्ये आमचे स्पष्ट बहुमत असल्याने आम्हाला बाहेरून मदत घेण्याची गरजच नव्हती. मतामधून भाजप एकसंध असल्याचे स्पष्ट झाले असून राष्ट्रवादीचे दोन सदस्य हे अंतर्गत वादातून गैरहजर राहिले असण्याची शक्यता असून तो त्यांचा अंतर्गत मामला आहे.

शेखर इनामदार, नगरसेवक, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य.

स्थायी सभापती निवडीवेळी आवश्यक संख्याबळाची जुळणी काँग्रेसने केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने दगा दिला. संयुक्त बैठकीमध्ये आघाडीच्या उमेदवारांच्या मागे ठामपणे राहण्याचे शब्द देऊनही दोन सदस्य गैरहजर राहिले. याबाबत सर्व घडामोडी पक्षाच्या नेत्यांना सांगून पुढील भूमिका निश्चित केली जाईल. -संजय मेंढे, गटनेते काँग्रेस.

Source link

Leave a Reply