गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यातील युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. या युतीचा नेमका कुणाला फायदा होणार? आणि शिवसेनेच्या परिस्थितीमध्ये या युतीमुळे फरक पडेल का? तो फरक नेमका काय असेल? अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. मात्र, त्यासोबतच संभाजी ब्रिगेडसोबत युती केली म्हणून भाजपा आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर सातत्याने खोचक टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपानं केलेल्या टीकेवर संभाजी ब्रिगेडनं खोचक शब्दांत टीका केली आहे.
“उद्धव ठाकरेंचा फुसका बार”
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या युतीबाबत बोलताना हा उद्धव ठाकरेंचा फुसका बार असल्याचं म्हटलं आहे. “२०१९मध्ये संभाजी ब्रिगेडची युती शिवसेनेसोबत होती. संभाजी ब्रिगेड तेव्हा ४० जागांवर लढले. पण त्यांना ३६ हजाराच्या वर मतं मिळवता आली नाहीत. ०.०६ टक्के मतं त्यांना मिळाली. त्यामुळे संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरेंनी फुसका बार सोडला आहे”, असा टोला बावनकुळेंनी लगावला आहे.
Shivsena and Sambhaji Brigade Yuti : राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडशी युती; उद्धव ठाकरे म्हणतात…!
“बावनकुळेंना पोटशूळ का उठलाय?”
मात्र, यावरून संभाजी ब्रिगेडने संतप्त प्रतिक्रिया देताना बावनकुळेंनाच उलट खोचक शब्दांत सल्ला दिला आहे. “बावनकुळे साहेब, का तुम्हाला पोटशूळ उठला आहे? तुम्हाला संभाजी ब्रिगेडची भिती का वाटतेय? एकाच दिवसात तुम्ही एवढं टेन्शन घेतलंय. झंडूबाम घेऊन ठेवा. कारण तुमच्या डोक्याला संभाजी ब्रिगेडचा आणि शिवसेनेशी युतीचा त्रास होणार आहे. लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरून भांडू, तेव्हा तुमच्या जातीयवादी आणि मनूवादी विचारांचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी बावनकुळेंना टोला लगावला आहे.
Video : “शिल्लक सेनेसोबत संभाजी ब्रिगेडने..”, शिंदे गटाकडून राष्ट्रवादीचा उल्लेख करत शिवसेनेवर आगपाखड!
दरम्यान, याआधीही बावनकुळेंनी या युतीवरून टीका केली होती. “उद्धव ठाकरेंना इतकी कमी मतं मिळवणाऱ्या पार्टनरसोबत युती करावी लागतेय. महाराष्ट्रातील कोणताही पक्ष त्यांच्याशी युती करायला तयार नाही. त्यांच्यासोबतचे मित्र त्यांना सोडून पळून जातील. संभाजी ब्रिगेडसोबत जाऊन काही होणार नाही. ते महाराष्ट्राला आव आणून सांगत आहेत. पण हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत वाईट आहे”, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडलं होतं.