महाविकास आघाडीमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंसहीत ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यामध्ये मागील महिन्याभरात अभूतपूर्व घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. सरकार अल्पमतात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३० जून रोजी बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सत्तांतरणानंतर शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
नक्की वाचा >> “मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी…”; उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंची सुपारी दिल्याच्या नितेश राणेंच्या आरोपांवर शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि शिंदे गटाला अनेक ठिकाणी मिळणाऱ्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर ‘शिवसंवाद’ यात्रा करत आहेत. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे, बंडखोर नेते गद्दार असून त्यांनी मुख्यमंत्री आजारी असताना गद्दारी केल्याचा आरोप करताना दिसताय. मात्र आता वडील आजारी असताना बंडखोरांनी सगळं जुळवून आणल्याच्या आदित्य यांच्या याच आरोपांवरुन भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी टीका केलीय. यावेळी नितेश राणेंनी त्यांच्या वडिलांना म्हणजेच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरुन उठवल्याची आठवणही आदित्य यांना करुन दिलीय.
नक्की वाचा >> ‘दिल्लीच्या आदेशानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले तर फडणवीस उपमुख्यमंत्री’ यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “त्यांनी दगड…”
“म्याव म्याव आवाज महाराष्ट्रभरात…”
आज नितेश यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांवर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना महाराष्ट्रभरातून म्याव म्याव असा आवाज येतोय असा खोचक टोला लगावला. “महाराष्ट्रात दौरे काढले जातायत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्याव म्यावचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहचतोय. म्हणून मी एवढं सांगितलं की हे म्याव म्यावचे आवाज बंद झाल्यानंतर कसं काय वस्त्रहरण होतं हे महाराष्ट्रासमोर आम्ही सुद्धा दाखवू, त्यासाठीच मी मुद्दाम असे ट्वीट केले आहेत. या माध्यमातून जो एकंदरीत आव आणला जातोय त्याबद्दल मला बोलायचं आहे.” असा इशारा नितेश यांनी शिवसेनेला दिलाय.
नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”
वडील आजारी असताना आदित्य डिनो मोरियाच्या घरी काय करत होते?
“असंही म्हटलं जातंय की पक्षप्रमुख (उद्धव ठाकरे) आजारी असताना यांनी (बंडखोरांनी) गद्दारी केली. मग मुंबईचे लोक जेव्हा करोनाच्या नावाने मरत होते, आजारी होते तेव्हा मुंबईचे पालकमंत्री असताना हे पर्यटनमंत्री नेमकं संध्याकाळी सात वाजता डिनो मोरियाच्या घरी काय करायचे?” असा प्रश्न नितेश राणेंनी विचारलाय. पुढे बोलताना त्यांनी, “एका बाजूला मुंबईचे लोक करोनामध्ये त्रस्त दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे संध्याकाळी सातच्या नंतर डिनो मोरियाच्या घरी काय करायचे? तेव्हा त्यांना (वडिलांचं आजारपण) काही दिसलं नाही का?” असंही नितेश यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
नक्की वाचा >> शिंदे विरुद्ध ठाकरे: निवडणूक आयोगाने बहुमताचा पुरावा सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर राऊत म्हणतात, “वरुन बाळासाहेबांचा आत्मा…”
नारायण राणेंना जेवत असताना अटक केल्याची करुन दिली आठवण
याच पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणेंनी त्यांच्या वडीलांसोबत महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये घडलेल्या प्रकरणाची आठवण करुन दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मागील वर्षी २४ ऑगस्ट रोजी संगमेश्वर येथे अटक करण्यात आलेली. राणेंना अटक करताना अगदी जेवणाच्या ताटावरुन ठवल्याचा व्हिडीओ त्यावेळेस चांगलाच व्हायरल झालेला. याच प्रसंगाची आठवण सध्या उद्धव ठाकरे आजारी असताना बंड करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या आदित्य ठाकरेना नितेश राणेंनी करुन दिलीय. “आपले वडील आजारी आहेत पण दुसऱ्यांच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरुन उठवताना तुम्हाला समाधान वाटतं का? हा प्रश्न मला आदित्य ठाकरेंना विचारायचा आहे,” असं नितेश राणे आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
नक्की वाचा >> शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”
राणेंची अटक व सुटका…
नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची कोकण विभागीय जनआशीर्वाद यात्रा मागील वर्षी २४ ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास चिपळूणहून संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे पोहोचली. तेथील गोळवलकर गुरुजी स्मारकामध्ये कार्यक्रम आटोपून अल्पोपहार सुरू असतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आपल्या ताफ्यासह तिथे दाखल झाले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अटक होऊ नये, अशी मागणी करणारा राणे यांचा अर्ज रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने फेटाळला. जनआशीर्वाद यात्रेत स्वत: राणेंसह त्यांचे चिरंजीव नितेश, नीलेश, आमदार प्रसाद लाड, यात्रेचे कोकण विभागीयप्रमुख प्रमोद जठार इत्यादींनी कारवाईसाठी आवश्यक कागदपत्रे दाखवण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करत तिथेच ठिय्या मांडला.
नक्की पाहा >> Photos: ‘फडणवीसांच्या पत्नीनेच…’, ‘कागद लिहून…’, ‘गुजरात, गुवाहाटी, गोव्यात…’, ‘फोडाफोडी करून जे..’; पवारांची फटकेबाजी
अटक वॉरंट दाखवले नाही तर तिथून न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथे प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. अखेर पोलीस अधीक्षक गर्ग यांनी राणे यांची समजूत काढून संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले आणि तिथे महाड पोलिसांच्या ताब्यात दिले होते. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी त्याच दिवशी रात्री जामीन मंजूर केला. मात्र, दिवसभर राणे यांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून ही अटकेची कारवाई करण्यात आलेली.