[ad_1]
राज्यात दोन जणांचे मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेले असताना मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही. हा खरंतर राज्यातील तेरा कोटी जनतेचा अपमान आहे. तुम्हाला बहुमत आहे तर मंत्रीमंडळ अस्तित्वात आणा. अतिवृष्टीमुळे आज शेतकरी त्रासून गेला आहे. अतिवृष्टी सुरु झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. ही सरकारच्यादृष्टीने शरमेची बाब असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे.
तातडीने अधिवेशन बोलवण्याचा राज्यसरकारला सल्ला
सध्या राजकीय घडामोडीमुळे राज्याचे अधिवेशन झाले नाही. आता मुख्यमंत्री दौरा काढणार आहेत. मात्र अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी लोकप्रतिनिधी फिरल्यानंतर आकडेवारी मांडण्याचे एकमेव साधन अधिवेशन आहे. तुमच्याकडे बहुमत आहे तर तुम्ही अधिवेशन का घेत नाही, असा सवालही पवारांनी शिंदेसरकारला विचारला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला तातडीने दिलासा द्या आणि आलेल्या आपत्तीमध्ये लक्ष घाला, असे आम्ही सांगितले होते. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन तात्काळ अधिवेशन घ्या अशी मागणी पत्राद्वारे केली असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली. एकंदरीतच मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही हे शिंदे व फडणवीस यांना माहीतच असेल. त्या दोघांना आपलं चांगलं चाललंय असं वाटतंय असा टोलाही पवार यांनी लगावला.
हेही वाचा- “खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार तुम्हाला…”, शिंदे गटाचा शिवसैनिकांना संतप्त सवाल
हवामान खात्याचा चूकीचा अंदाज
चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सध्या राज्यातील धरणाची पाणी परिस्थिती सुधारली आहे. धरणे तुडुंब भरली आहेत. निसर्गाचा प्रकोप झाला त्यावेळी एसडीआरएफचे नियम बाजूला ठेऊन मदत केली होती. परंतु आज निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावं लागत आहे. तर दुसरीकडे हवामान खात्याचे अंदाज सध्या चुकताना दिसत आहेत. रेड अलर्ट देतात आणि पाऊसच पडत नाही. मात्र, शाळांना सुट्टी जाहीर होते. हवामान खात्यावर केंद्रसरकारने व राज्याने हवा तो खर्च करावा आणि सुधारणा करावी. हवामान खात्याने जाहीर केले की पाऊस पडतच नाही, असे म्हणत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा- ‘गडकरींना राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटतोय’, अजित पवार म्हणाले “सत्ताधारी पक्षात असतानाही…”
विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे अजित पवारांची राज्यसरकारवर टीका
शिंदेनी तर आमच्या सरकारमध्ये काम केले तेच आज आमच्या सरकारमधील कामांना स्थगिती देत आहेत. सरकारे येत असतात जात असतात. हे सरकार काय ताम्रपट घेऊन आले आहे का? विकासकामे का थांबवत आहात. आमच्या घरातील कामे आहेत का? जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आला होता हे लक्षात घ्या, असेही अजित पवार यांनी सरकारला खडसावले.
[ad_2]