[ad_1]
राज्यातील सत्ताबदलानंतर आता यंदाचा शिवसेनाच्या दसरा मेळाव्याची अधिकच चर्चा सुरू झाली आहे. कारण, शिवतीर्तावरील दसरा मेळाव्यावर हक्क सांगण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट चढाओढ पाहायला मिळत आहे. शिवाय, मागील काही दिवसांपासून दोन्हीकडून मेळावा आम्हीच घेणार असा दावा केला जात आहे. असं असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षांकडूनही यासंदर्भात मतं व्यक्त केली जात आहेत. दरम्यान, भाजपाकडून उद्धव ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेऊ ने देण्यासाठी आणि एकनाथ शिंदें गटाचा मेळावा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हे खूप दुर्दैवी आहे. शरद पवार दहा-पंधरा दिवसांपूर्वी एक गोष्ट बोलले होते. मुख्यमंत्री हे पद खूप मोठं असतं आणि ते सर्वसमावेशक असलं पाहीजे. आमच्याही काळात दसरा मेळावे व्हायचे. अनेक पक्षांचे मेळावे व्हायचे. दिलदारपणे आमच्याविरोधात त्या व्यासपीठांवरून भाषणं व्हायची. आमही उत्सुकतेने किंवा ते आपल्या विरोधात काय बोलत आहेत, हे जाणून घेण्यासाठी बघायचो. त्यामळे मोठा नेता हा केवळ पदाने मोठा होत नाही, तो कर्तृत्वाने होतो आणि दिलदार असतो. मोठ्या पदावर बसणारा नेता हा दिलदार असला पाहिजे. त्यामुळे सध्या जे काही सुरू आहे ते दुर्दैवी आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी ही बाब आहे. ”
याशिवाय “मला आठवतं जेव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे शिवाजी पार्कवरून हे दिलदारपणे शरद पवारांवर टीका करायचे. विरोधक हा दिलदार असला पाहिजे, नाहीतर राजकारण आणि समाजकारण करायला मजा कशी येणार? ” असंही सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवलं.
तर, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात काही नाराजी निर्माण झाल्याच्या चर्चा मध्यंतरी समोर येत होत्या, त्याबाबत प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंनी सांगितलं की, “राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल चर्चा करायला लोकांना खूप आवडतं. अजित पवार आणि जयंत पाटील हे विकासकामात आणि संघटनाबांधणीत इतके व्यस्त असतात की ते दोघेही चर्चांमध्ये फारसा वेळ घालवत नाहीत. म्हणूनच तर पक्षाची कामगिरी एवढी चांगली झाली आहे. ”
[ad_2]