Headlines

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था ; भूमिपूजनानंतरही काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात नाही

[ad_1]

हर्षद कशाळकर, लोकसत्ता 

अलिबाग: पावसाळय़ाची सुरुवात झाली, की मुंबई-गोवा महामार्गावर खड्डय़ांचा त्रास सुरू होतो. कोकणात जाताना त्याचा त्रास होतो. महामार्गावर वडखळ ते इंदापूर मार्गाची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

वडखळ ते इंदापूर मार्गावर सध्या मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत.  २०११ पासून मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. बारा वर्षे पूर्ण होत आली तरी ८४ किलोमीटर लांबीचे हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

महामार्गाची दरवर्षी होणारी दुरवस्था लक्षात घेऊन या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केली होती. यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाच्या काँक्रीटीकरणाचा निर्णय घेतला. कासू ते इंदापूर मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी ४४० कोटींचा निधीही मंजूर केला. ३ एप्रिल २२ रोजी इंदापूर येथे या कामाचा भूमिपूजन संमारंभ पार पडला. निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यावर लागलीच कामे सुरू होतील, अशी घोषणा या वेळी करण्यात आली. वर्षभरात मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्वच टप्प्यांतील कामे मार्गी लावण्याची ग्वाही गडकरी यांनी या वेळी दिली होती; पण भूमिपूजनानंतर तीन महिने लोटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही.   

महामार्गावर कोलाड येथील पुई गावाजवळ असलेला पूल जीर्ण झाला आहे. नवीन पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे काम जवळपास ठप्प आहे.

रस्त्याची स्थिती..

महामार्गाच्या पळस्पे ते वडखळ मार्गाचे चौपदरीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र वडखळ ते इंदापूरदरम्यान रस्त्याचे काम जवळपास ठप्प आहे. नागोठणे ते वाकण फाटादरम्यान रस्त्याची दुरवस्था कायम आहे. कोलाड परिसरात रस्त्याची कामे झालेली नाहीत. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा पुन्हा एकदा अतिक्रमणे झाल्याचे पाहायला मिळत आहे. इंदापूर येथे रस्ता रुंदीकरण झाले नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आहे. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास खडतर ठरत आहे.

वडखळ ते इंदापूर रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जे अंतर दीड तासात पार व्हायला हवे त्याला अडीच ते तीन तास लागत आहेत. खराब रस्त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हायला हवी.

संतोष म्हात्रे, वाहनचालक

पळस्पे ते इंदापूरदरम्यानच्या रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. माणगाव ते पोलादपूर मार्गाची परिस्थिती फारशी चांगली नाही. महामार्गावर वाहतूक सूचना फलक बसविण्यात आलेले नाहीत, खड्डे योग्य प्रकारे भरण्यात आलेले नाहीत. सव्‍‌र्हिस रोडची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही.

अ‍ॅड. अजय उपाध्ये, सामाजिक कार्यकर्ते

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *