[ad_1]
मुंबईत झालेल्या शिवसेना गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी भाषणात उद्धव ठाकरेंनी सर्वच मुद्द्यांवर भाष्य करताना शिंदे गटालाही लक्ष्य केलं. “सगळे मिंधे तिकडे गेले आहेत. पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढत आहेत. या लढाईत ते आमच्यासोबत असून हातात तलवार घेऊन आघाडीवर लढत आहेत”, असं उद्धव ठाकरे या भाषणात म्हणाले. यासंदर्भात बोलताना आता मनसेनं उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या या विधानाचा समाचार घेतला. तसेच, याआधीही उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात राज ठाकरेंचा उल्लेख ‘मुन्नाभाई’ असा केल्याचा संदर्भदेखील संदीप देशपांडेंनी यावेळी दिला.
“कमजोर मुलावर आई-वडिलांचं जास्त प्रेम”
“जो कमजोर मुलगा असतो, त्याच्यावर आई-वडिलांचं प्रेम जास्त असतं. जो कर्तृत्ववान मुलगा असतो, त्याच्याबद्दल त्यांना माहिती असतं की हा त्याचं त्याचं काम करेल, खाईल, घर घेईल. पण कमजोर मुलावर आई-वडिलांचं प्रेम जास्त असतं. त्यामुळे त्याला ते घरही देतात, सगळं देतात. कारण त्याच्यात कर्तृत्व नसतं”, असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.
“यांना काय उत्तर देणार?”
“बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी ही बांडगुळं आहेत. मग यांना काय उत्तर द्यायचं? यांचं स्वत:चं कर्तृत्व शून्य आहे. म्हणून मग कुणाला मिंधे, कुणाला मुन्नाभाई, कुणाला आणखीन काय म्हणत राहायचं”, अशा शब्दांत संदीप देशपांडेंनी टीका केली.
[ad_2]