[ad_1]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपा-मनसेची युती होईल, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर राज ठाकरे सत्तेसाठी लाचारी करत आहेत, अशी टीका शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केली होती. त्याला आता मनसेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
मनीषा कायंदे यांच्या टीकेचा समाचार मनसेचे नेते गजानन काळे यांनी घेतला आहे. ते म्हणाले, “या महाराष्ट्रात हिंदुत्व आणि मराठीला बगल देऊन शिल्लक सेना व नवाब सेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केली. एमआयएम नगरसेवकांच्या जीवावर अंबादास दानवे निवडूण येतात. राज्यसभेला शिल्लक सेना एमआयएमची मदत मागते. आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि मराठीशी प्रतारणा करण्याचे काम शिल्लक सेना आणि प्रमुखांनी केलं आहे. वरुन लाचारीचा आरोप आमच्यावर केला जात आहे. आम्हाला उद्देश, प्रवचन देणं मनीषा कायंदेंनी बंद करावं. त्यांनी आता नाकाने कांदे सोलू नये. तुमच्या इच्छा, आकांशा मनीषा पूर्ण होणार नाही आहे,” असेही गजानन काळेंनी म्हटलं आहे.
काय म्हणाल्या होत्या मनीषा कायंदे?
“राज ठाकरे यांनी २०१४, २०१९ मध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपावर सडकून टीका केली होती. आता त्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली आहे. ज्या लोकांनी त्यांना शिव्या घातल्या, त्यांच्याकडे जाऊन ते सत्तेसाठी हातमिळवणी करत आहेत, गळाभेट घेत आहेत. हे सगळं महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय. त्यांचा हिंदुत्वाचा मुखवटा गळून पडला आहे. त्यामुळे असली कोण आणि नकली कोण? हेही महाराष्ट्राला कळालं आहे,” अशा शब्दांत मनीषा कायंदे यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला होता.
[ad_2]