ठाणे आणि अहमदनगर हे दोन जिल्हे जोडणारा कल्याण अहमदनगर महामार्ग ठप्प झाला आहे. या महामार्गावरील किशोर गावाजवळ मुरबाडी नदीचे पाणी साचल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुरबाड तालुक्यात याच महामार्गावर मोरोशी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावरील माती आणि झाडे झुडपे रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्याचा लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गेल्या २४ तासात ठाणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणार आणि ठाणे – अहमदनगर या जिल्ह्यांना जोडणारा कल्याण अहमदनगर महामार्ग बुधवारी दुपारच्या सुमारास ठप्प झाला. कल्याण- अहमदनगर महामार्गावर मुरबाड तालुक्यात किशोर गावाजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली होती.
किशोर गावाजवळून मुरबाडी नदी वाहते. या नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. तर याच मार्गावर पुढे मोरोशी येथे डोंगरावरील माती आणि झाडे झुडपे रस्त्यावर घरंगळत आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. प्रशासनाच्या वतीने ही झाडे काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्याचा कल्याण अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
दुपारी तीन नंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली होती अशी माहिती मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी यांनी दिली आहे. तर मुरबाड तालुक्यात चासोळे येथे पुलावर पाणी आल्याने वाहतूक काही काळ बंद होती. मुरबाड तालुक्यातील शेलगाव, पिंपळगाव अशा दोन ठिकाणी घराच्या भिंती कोसळून अपघात झाला. मात्र सुदैवाने यात कोणतेही जीवित हानी झाली नाही. या ठिकाणी पंचनामा पूर्ण केल्याची माहिती आवारी यांनी दिली आहे.
याच मार्गावर रायते येथे उल्हास नदीवर असलेल्या पुलाला नदीचे पाणी पोहोचले होते. तर रायते – बदलापूर या दहागाव मार्गावर वैष्णोदेवी मंदिराजवळ चा रस्ता पाण्याखाली गेल्याने टिटवाळा बदलापूर ही वाहतूक ठप्प झाली होती.