[ad_1]
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी म्हणून ठाकरे गट आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिवतीर्थावर मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, म्हणून दोन्ही गटांनी महानगरपालिकेत अर्ज दाखल केले आहेत. पालिकेनं अद्याप कोणत्याही गटाला शिवतीर्थावर परवानगी दिली नाही.
दरम्यान, दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केले होते. यावर महापालिकेनं निर्णय घेतला असून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला परवानगी दिली आहे. शिंदे गटानं पहिल्यांदा अर्ज दाखल केल्याने, त्यांना पहिल्यांदा परवानगी देण्यात आल्याचा निकष महापालिकेनं लावला आहे. यानंतर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- “तुम्हाला एकच मुलगी आहे, उद्या काही झालं तर अग्नी कोण देणार? त्या प्रश्नावर मी म्हणालो…”; शरद पवारांनी सांगितली आठवण
दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले की, आमचा कोणताही गट नाही, आमची शिवसेना आहे. बीकेसी मैदानावर परवानगी मिळावी यासाठी भारतीय कामगार सेनेच्या वतीने अर्ज करण्यात आला होता. आता मला अशी माहिती मिळाली आहे की, एमएमआरडीने शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यांनी पहिल्यांदा अर्ज दाखल केला म्हणून त्यांना पहिल्यांदा परवानगी मिळाली, हा निकष महापालिकेनं लावला आहे.
हेही वाचा- “त्यांनी कधीपासून चमचेगिरी सुरू केली” शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा अजित पवारांवर हल्लाबोल
हाच निकष लावायचा असेल तर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदा अर्ज दाखल केला होता. त्यामुळे शिवतीर्थावर आम्हालाच परवानगी दिली पाहिजे. शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी अद्याप परवानगी दिली नसली तरी अजून नकारही देण्यात आला नाही. त्यामुळे आम्हाला तिथे परवानगी नाकारली तर पुढचा निर्णय घेऊ. पण शिवतीर्थावर आम्हाला परवानगी नक्की मिळेल, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे.
[ad_2]