विधानपरिषद लक्षवेधी


मुंबई, दि. 23 : औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये झालेल्या अनियमिततेची पंधरा दिवसात चौकशी करण्यात येईल तसेच दोषींवर कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

श्री.सामंत म्हणाले, औरंगाबाद येथील विद्यापीठातील अनियमिततेसंदर्भात स्वतः राज्यपाल यांची भेट घेतली असून या विद्यापीठासह इतर विद्यापीठातील अनियमिततेच्या संदर्भातही चर्चा केली आहे. कुलगुरु यांच्या हाताखालील अधिकारी, कर्मचारी यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. मात्र विद्यमान आणि माजी कुलगुरु यांच्या विरोधात चौकशी सुरु करण्यापूर्वी विधी व न्याय विभागाचे मत विचारात घेतले जाईल, असेही ते म्हणाले.

राज्यातील अनेक विद्यापीठांनी लेखा परिक्षण अहवाल सादर केले नसल्याचे सांगून श्री.सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठ, एस एन डी टी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर या विद्यापीठांनीही गेल्या काही वर्षांपासून लेखा परीक्षण अहवाल सादर केले नसल्याचे त्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

या विषयावरील झालेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी यावेळी दिले. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नागोराव गाणार, अंबादास दानवे आदिंनी सहभाग घेतला होता.

***

परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी १०वी तसेच १२वीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतरही विलंब फी आकारणार नाही – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 23 : परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब फी भरावी लागत होती. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब फी आकारण्यात येणार नसल्याची माहिती विधानपरिषदेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ‍दिली.

राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परिक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये तांत्रिकदृष्ट्या येत असलेल्या अडचणी पाहता शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालक यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी सभागृहात मांडली. सर्वश्री सदस्य अभिजित वंजारी, अनिल तटकरे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इ.१०वी व इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर विलंब फी भरावी लागत होती. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब फी आकारण्यात येणार नाही. कुठलेही विलंब शुल्क न भरता इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षेसाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे. तांत्रिक बाबींमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. काही गावांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. आतापर्यंत इ.१२ वीचे १४,३१,६६७ आणि इ.१० वीचे १५,५६,८६१ आवेदन पत्रे प्राप्त झाले आहेत. शाळेच्या संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करून परीक्षा फॉर्म भरून घेण्याबाबत सर्व शाळा, कॉलेजना कळवण्यात येईल यासंदर्भात जाहीर प्रसिद्धी वर्तमानपत्रांद्वारे देण्यात येईल, अशी माहितीही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली

*****

बोईसर येथील हरवलेल्या विद्यार्थिनीचा तपास गुन्हे शाखेकडे देणार – गृह राज्यमंत्री सतेज पाटील

मुंबई, दि. 23 : बोईसर येथील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीचा शोध मुंबई गुन्हे शाखेकडे देणार आहे. या विद्यार्थिनीचा शोध लवकरात लवकर लागावा यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडे हे प्रकरण देण्यात येणार आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी एका लक्षवेधीला उत्तर देताना विधानपरिषदेत दिली.

सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी बोईसर येथील एमबीबीएसची विद्यार्थिनी ही परिक्षेसाठी घराबाहेर पडलेली असताना वांद्रे बॅण्ड स्टँडवरुन दिवसाढवळ्या गायब झाल्याचे 29 नोव्हेंबर, 2021 मध्ये उघडकीस आल्याचे सांगितले. या घटनेला 15 दिवस उलटूनही अद्याप तरुणीचा शोध लागलेला नाही याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सर्वश्री गोपिचंद पडळकर, रमेशदादा पाटील यांनीही सहभाग घेतला.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, बोईसर येथील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी गृह विभागाचे सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहे. हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे द्यावा अशी मागणी लक्षात घेता तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येईल. राज्यात हरवलेल्या मुली अथवा मुलांसाठी मुस्कान हे ऑपरेशन राबविण्यात येते. आतापर्यंत गृह विभागाने अनेक हरवलेल्या मुला-मुलींना त्यांचे स्वत:चे घर पुन्हा मिळवून दिले आहे. शासन महिलांच्या प्रश्नाबाबत सजग असून महाविद्यालय स्तरावरही महिलांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरेही वाढविण्यात येत आहेत. सायबर गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी फेसबुक तसेच इन्स्टाग्राम यासारख्या समाजमाध्यमांच्या संदर्भातही सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरच उपाययोजना करण्यात येतील. यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या पालकांना द्यावयाच्या मदतीबाबतही आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या चर्चेच्या अनुषंगाने उपस्थित उपप्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.

०००००

शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत शासन शेतकऱ्यांच्या बाजूने – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

मुंबई, दि. 23 : राज्यात कृषीपंपाच्या बिलाबाबत शासन नक्कीच शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांच्या वीजबिलाबाबत कृषीधोरण 2020 अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सदाशिव खोत यांनी वीज वितरण कंपनी कृषीपंपाची भरमसाठ बिले आकारत आहे. वीज गळती रोखणे व जेवढा वीजेचा वापर आहे तेवढेच बील वीज ग्राहकांना देण्यात यावीत, कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांची विद्युत जोडणी कापत असल्याबाबतची लक्षवेधी विधानपरिषदेत मांडली. या लक्षवेधीत सर्वश्री प्रविण दरेकर, गोपिचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, महावितरण कंपनीकडे खूप मोठ्या प्रमाणात वीज बिलांची थकबाकी आहे ही थकबाकी कमी व्हावी यासाठी राज्य शासन मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. कृषीपंप वीज धोरण २०२० अंतर्गत राज्यात ६६ हजार नवीन वीज कनेक्शन देण्यात आली आहेत. वीजगळती कमी करून जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यासाठी वीज वितरण कंपनी देखील सदैव तत्पर आहे, अशी माहिती यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

००००

Source link

Leave a Reply