Headlines

“कोश्यारींसारख्यांना महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत”, आदित्य ठाकरेंचा राज्यपालांवर हल्लाबोल | Aaditya Thackeray allege Bhagat Singh Koshyari want five part of Maharashtra pbs 91



राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई व ठाण्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट हल्ला चढवला आहे. कोश्यारी आणि त्यांच्यासारख्यांना आपल्या महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत, असा गंभीर आरोप ठाकरेंनी केला. तसेच त्यांच्या या महाराष्ट्र संपवण्याच्या राजकारणात आपले ४० निर्लज्ज गद्दार फसले आहेत, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. ते सोमवारी (१ ऑगस्ट) सिंधुदुर्गमधील शिवसंवाद यात्रेदरम्यान आयोजित सभेत बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रत्येकाला उद्धव ठाकरे आपला कुटुंबप्रमुख वाटायचे. कोणताही वाद, दंगल झाली नाही. पण आता त्याच आपल्या महाराष्ट्राला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व त्यांच्यासारखी माणसं फोडू पाहत आहेत. त्यांना महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत. ही मंडळी आपल्यात वाद निर्माण करत आहे.”

“महाराष्ट्र संपवण्याच्या राजकारणात आपले ४० निर्लज्ज गद्दार फसले”

“मराठी माणसाला वेगळं करायचे, शिवसेनेला फोडायचं, संपवून टाकायचं, ठाकरे कुटुंबाचं महत्त्व कमी करायचं, असा प्रयत्न सुरू आहे. मात्र, ठाकरे कुटुंब संपणार नाही, कारण ते माझ्यासमोर इथं सभेत उभं आहे. जे प्रश्न विचारतील, ज्यांचा आवाज बुलंद आहे त्यांच्यावर दडपशाही करायची, महाराष्ट्राला संपवून टाकण्याचा प्रकार सुरू आहे. एकदा महाराष्ट्र संपला की त्यांचे सर्व धंदे सुरू होतील, असं त्यांचं राजकारण आहे. याच राजकारणात आपले ४० निर्लज्ज गद्दार फसले आहेत,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले आहेत हे ओळखा. त्यांनी मुंबई व ठाण्याची मुद्दाम नावं घेतली. निवडणूक येत आहे आणि अशात या ठिकाणी हिंदूंची, तेथील नागरिकांची एकजुट झाली आहे. ते शिवसेनेमागे खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्यात मागील अडीच वर्षात भाषा, प्रांत किंवा धर्मावरून भांडण लागलं नाही. उद्धव ठाकरे प्रत्येकाचे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते,” असंही ठाकरेंनी नमूद केलं.

“गद्दारांच्या मनात शिवसेनेबद्दल, शिवसैनिक, पक्षप्रमुख व माझ्याविषयी द्वेष”

बंडखोरांवर बोलताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “माझ्या मनात या गद्दारांविषयी राग, द्वेष नाही. हे गद्दार आधी सांगायचे की आमच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी, आदित्य ठाकरेंविषयी प्रेम आहे, आदर आहे. तुमच्याविषयी मनात उच्चस्थान आहे. मात्र, त्यांच्या दोन आठवड्यातील पत्रकार परिषदा आणि वक्तव्ये काढा. त्यांच्या मनात आणि डोळ्यात शिवसेनेबद्दल, शिवसैनिकांविषयी, पक्षप्रमुख व माझ्याविषयी राग व द्वेष दिसत आहे. ते आता कळायला लागलं आहे,” असं ठाकरेंनी सांगितलं.

“सगळं यांनाच द्यायचं का? इतरांना काहीच द्यायचं नाही का?”

“सगळं यांनाच द्यायचं का? इतरांना काहीच द्यायचं नाही का? आम्ही यांना काय कमी दिलं. त्यांना प्रेम, विश्वास दिला, उद्धव ठाकरे व शिवसैनिकांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. शिवसेनेचा उमेदवार म्हणून मतदारांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलं. त्यांना दोनदा निवडून आणलं, मागच्या वेळी मंत्री केलं,” असं ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : Photos : सकाळी सात वाजता घरात, १० तास चौकशी, दिवसभरात ईडीकडून संजय राऊतांवर नेमकी काय कारवाई? वाचा…

“तुमच्या मनात आमच्याविषयी राग का?”

“अनेक गद्दार आहेत ज्यांच्यासाठी आपण सगळं केलं. व्यक्तिगत आणि राजकीय आयुष्यात सर्व केलं, आपण त्याचा उल्लेखही करत नाहीत. मग तुमच्या मनात आमच्याविषयी राग का? का पाठीत खंजीर खुपसला? हा प्रश्न अजूनही माझ्या मनात कायम आहे,” असंही आदित्य ठाकरेंनी नमूद केलं.



Source link

Leave a Reply