[ad_1]
मासिक पाळी आली म्हणून विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या देवगाव आश्रम शाळेत हा प्रकार घडला आहे. ‘पाळी आलेल्या मुलींनी झाड लावलं तर ते झाड जळतं’, अस म्हणत शिक्षकांनी विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखलं आहे. याप्रकरणी पीडित मुलीने आदिवासी विकास विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
मासिक पाळी आली म्हणून वृक्षारोपण करण्यापासून रोखलं
मिळालेल्या माहितीनुसार, गेलेल्या आठवड्यात त्र्यंबकेश्वरमधील देवगावच्या आदिवासी आश्रमशाळेत वृक्षारोपण करण्यात येत होतं. १० मुलींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार होतं. मात्र, शिक्षकांनी या मुलीमध्ये मासिक पाळी असलेल्या मुलीला वृक्षारोपण करण्यापासून रोखलं. ‘मागच्या वर्षी जी झाडे लावण्यात आली होती ती जगली नाहीत. कारणं मासिक पाळी आलेल्या मुली झाडाजवळ जातात आणि त्यामुळे झाडं जगत नाही’, अस शिक्षकांचं म्हणणं आहे.
आदिवासी विकास विभागाकडे तक्रार दाखल
तसेच ‘ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे त्यांनी झाडे लावायची नाहीत. कारण त्यांनी लावलेली झाडे मरतात. मासिक पाळीत मुलींनी झाडाकडे यायचं सुद्धा नाही’, असं शिक्षक म्हणाले असल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनीने केला आहे. याबद्दल मुलींनी शिक्षकांना प्रश्नही विचारला मात्र, शिक्षकांनी दमदाटी करत गप्प बसण्यास सांगितलं असल्याचेही पीडित विद्यार्थिनी म्हणाली. या प्रकरणी आदिवासी विकास विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आश्रमशाळेवर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहण महत्वाचं आहे.
[ad_2]