[ad_1]
पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात भाजपाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले आहे. या आरोपानंतर आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. असे असताना या आरोपानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ईडीचे आरोपपत्र व २००६ साली मी घेतलेल्या बैठकीचे आरोप खोटे आहेत. तरीही चौकशी करावी. चौकशीतून आरोप खोटे निघाले तर, आरोप करणाऱ्यावर काय कारवाई करणार, हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे आव्हान शरद पवार यांनी केले.
शरद पवार काय म्हणाले?
पत्रा चाळप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. चौकशी करणाऱ्या संस्थेने कोर्टात काय सांगितलं? तसेच तेव्हा राज्य सरकारमध्ये काय चर्चा झाली याची प्रत माझ्याकडे आहे. चौकशीला नाही म्हणण्याची आमची भूमिका नाही. चौकशी झाल्यानंतर हा आरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल, तर काय भूमिका घेणार, हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांच्यावरील आरोप काय ?
पत्राचाळ प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवारी केली. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे या मागणीला पाठिंबा दिला आहे. जवळ जवळ १ हजार ३९ कोटींच्या पत्रा चाळ प्रकरणी अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी शरद पवार यांचीही चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कार्यालयामध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत संजय राऊतांच्या उपस्थितीत पत्रा चाळसंदर्भात बैठका झाल्या, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.
[ad_2]