राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनात शिंदे गट-भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. तसेच या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. आजच्या विश्वासदर्शक ठरावानंतर मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्याला विराम मिळाला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे गेलेले बंडखोर आमदार सरकार स्थापन झाल्यानंतर प्रतिक्रिया देत आहेत. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील हे सरकार पूर्ण वेळ टिकणार असून पुढील निवडणुकीत दोन्ही पक्ष २०० पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच मी हिंदुत्त्वावादी पार्टीचाच आमदार आहे, असेही सत्तार म्हणाले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
हेही वाचा >>> महाभारत, रामायण ते पानिपतचं युद्ध, अधिवेशनात भास्कर जाधवांचं खणखणीत भाषण, भाजपावर टीकेचे आसूड
“मी शिवसेना पक्षाच्या चिन्हावरच निवडून आलो. धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आल्यानंतर मी काय एमआयएमचा आमदार आहे का? मी हिंदुत्त्ववादी पार्टीचाच आमदार आहे. युतीसाठी हिंदुत्त्ववादी पार्टीसोबत गेलो, तर त्यात काही चूक नाही,” असे अब्दुल सत्तार म्हणाले.
हेही वाचा >>> अधिवेशनात गुलाबराव पाटलांचे आक्रमक भाषण, म्हणाले ‘आम्ही बंड नाही तर…’
तसेच पुढे बोलताना, “माझ्या मतदारसंघात म्हणजेच सिल्लोडमध्ये २०१४ साली शिवसेनेला एक हजार मते मिळाली होती. २०१९ साली सव्वा लाख मते मिळाली. माझ्या गावात अगोदर शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य नव्हता, सरपंचही नव्हता, नगरसेवक नव्हता मी एकटाच आहे. म्हणून माझी पार्टी तिथे आहे. माझा प्रासंगिक करार आहे, तो संपला आहे,” असे स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिले.
हेही वाचा >>> बंडखोर आमदारांना परत बोलवणारे संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितली इनसाईड स्टोरी, म्हणाले…
तसेच, “आगामी काळात दोन्ही पक्षांचे मिळून २०० जागांवर आम्ही जिंकू असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मला विश्वास आहे की, शिवसेना आणि भाजपा युती २०० जागा जिंकेल,” असे सत्तार म्हणाले.