[ad_1]
मुंबई : महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. राज्यात वेगाने विकास होण्याची क्षमता असून येथे येणाऱ्या उद्योगांना शासनामार्फत संपूर्ण सहकार्य दिले जाईल. राज्याच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त आयोजित संकल्प ते सिद्धी (नवा भारत, नवे संकल्प) परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह भारतीय उद्योग महासंघाचे पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.
देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना येणाऱ्या पुढच्या २५ वर्षांत नेमकी काय प्रगती आणि विकास करायचा आहे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर असे राज्य ही ओळख कायम टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या पाच वर्षांत समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्याबरोबरच खालापूर ते सिंहगड येथे सर्वात मोठा बोगदा बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. हा बोगदा बांधण्यात आल्याने आता मुंबईहून पुण्याला जाताना वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. राज्यात येणाऱ्या काळात रस्त्यांचे आणि पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारीकरण यावर भर देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यांमुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. राज्यात विविध प्रकल्प आणि योजना राबवित असताना आणि एकात्मिक प्रगती साध्य करीत असताना शेवटच्या घटकापर्यंत ही मदत पोहोचणे यावर भर देण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे काम असेल किंवा मुंबईत मेट्रो सेवा सुरू करणे, बुलेट ट्रेन यांसारखे प्रकल्प सुरू केले तर मुंबई हा देशाशी जोडला जाण्यास महत्वपूर्ण ठरणार आहेत, असे ते म्हणाले.
[ad_2]