Headlines

deepak kesarkal clarification on sharad pawar ncp criticism



दोन दिवसांपूर्वी शरद पवारांवर शिवसेना फोडल्याचा आरोप करणारे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी पवारांविषयीच्या आपव्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. प्रसारमाध्यमांनी शरद पवारांविषयीचं विधान आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात विचारणा केली असता दीपक केसरकर यांनी आपल्या वक्तव्याविषयी खुलासा केला आहे. तसेच, शरद पवारांविषयी मी कधीही अपशब्द काढलेला नाही, असं देखील दीपक केसरकर यावेळी म्हणाले आहेत. मात्र, आपल्या वक्तव्यावर खुलासा करतानाच केसरकरांनी जितेंद्र आव्हाड यांना देखील लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाले होते केसरकर?

“मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सांगायचे”, असं केसरकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं होतं. “शरद पवारांनीच मला, जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवलेली नाही, असं सांगितलं होतं. हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती,” असा दावा केसरकरांनी केला होता.

“त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. ‘मातोश्री’ कधी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही शरद पवारांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हतं,” असंही केसरकर म्हणाले होते.

“..तेव्हाही शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली होती”

दरम्यान, या वक्तव्यांवरून टीका सुरू झाल्यानंतर आज त्यावर केसकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी कधीही शरद पवारांविषयी अनुद्गार काढलेले नाहीत. माझ्या जडणघडणीत ज्या नेत्यांचा मोठा वाटा आहे, त्यापैकी एक शरद पवार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल एकही अपशब्द माझ्या तोंडून येऊ शकत नाही. २०१४ सालामध्ये आम्ही जेव्हा स्वतंत्र निवडणूक लढलो आणि त्यानंतर जेव्हा सरकार स्थापन झालं, तेव्हा शरद पवारांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हाही शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली होती”, असं केसरकर यावेळी म्हणाले.

‘जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवार होते’ म्हणणाऱ्या केसरकरांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “२०१४ ला मीच…”

“जाहीर दिलगिरी व्यक्त करतो”

“ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आदर आहे. जर त्यांच्याबद्दल माझ्या तोंडून चुकून एखादा शब्द निघाला असेल, तर त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो”, असं देखील केसरकर म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांचा दावा फेटाळला!

दरम्यान, यावेळी बोलताना दीपक केसरकरांनी जितेंद्र आव्हाडांचा दावा फेटाळला आहे. “आव्हाडांनी म्हटलंय की ते शरद पवारांच्या वतीने मला भेटायला आले होते. आव्हाड हेलिकॉप्टरने माझ्याकडे आले होते, ही वस्तुस्थिती आहे. पण ते नारायण राणेंच्या मुलाचा प्रचार करा असं सांगायला आले होते. ते अजिबात शरद पवारांचा निरोप घेऊन आले नव्हते. शरद पवार माझ्या मतदारसंघात आले, तेव्हा मी त्यांना राजीनामा दिला. मी त्यांना नम्रपणे सांगितलं की तुमच्यामुळे मी आमदार आहे. पण मी त्यांचा प्रचार करू शकत नाही. तुमच्याबरोबर स्टेजवर येऊ शकत नाही म्हणून मी आमदारकीचा राजीनामा देतो, असं पत्र मी त्यांना दिलं होतं”, असं केसरकरांनी सांगितलं.

“एवढं प्रेम ज्याच्या मनात आहे, तो शरद पवारांबद्दल काही बोलू शकतो, असं मला वाटत नाही. गरज पडली, तर शरद पवारांच्या घरी जाऊन मी दिलगिरी व्यक्त करेन”, असं केसरकर यावेळी म्हणाले.



Source link

Leave a Reply