[ad_1]
कृष्ण जन्माष्टमीनिमित्त राज्यात भाजपाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना भाजपाकडून १० लाख रुपयांचा विमा कवच देण्यात येणार आहे. यासंदर्भात भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि सुरक्षित दहीहंडीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन राणे यांनी केले आहे. जन्माष्टमीनिमित्त राज्यात आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव जितका लोकप्रिय आहे तितकीच त्यात जोखीम देखील आहे. दहीहंडीवेळी थरावरुन पडल्याने अनेक गोविंदांनी आजवर आपला जीव गमावला तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले. या उत्सवात जखमी झालेल्या गोविंदाकडे अनेकदा कानाडोळा करण्यात येतो. या अपघातामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटून जाते. या बाबी लक्षात घेता भाजपाकडून ही योजना राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, दहीहंडीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सरकारच्या परिपत्रकानुसार येत्या १९ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी असेल. सण साजरा करताना कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. दहीहंडी मंडळांना परवाने मिळावेत, यासाठी सरकारने खिडकी योजना देखील सुरू केली आहे.
[ad_2]