[ad_1]
‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ आज राज्यभरात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या जाहिरातीवरुन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात सेवा पंधरवड्याची पूर्ण पान जाहिरात दिली. मात्र, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाची शासकीय जाहिरात मराठवाड्यासह कुठेही दिसली नाही” असे ट्वीट करत सावंत यांनी याबाबत निषेध व्यक्त केला आहे. नेत्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा विसर पडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
“आजतरी शहिदांचा..,” मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमावरील टीकेनंतर देवेंद्र फडणवीसांनी केलं शिवसेनेला लक्ष्य
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबाद, नांदेडमध्ये विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबादमधील शासकीय कार्यक्रम यंदा सकाळी नऊऐवजी सात वाजताच आटोपण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर ते हैदराबादमधील एका कार्यक्रमासाठी रवाना झाले होते. याच मुद्द्यावरुन दिवसभर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करत शिवसेनेने औरंगाबादमध्ये पुन्हा ध्वजारोहण केले. “मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. एकनाथ शिंदे दिल्लीच्या पातशाहांच्या आदेशावरून निर्णय घेतात आणि त्यांच्या आदेशावरूनच हैदराबादला जातात”, अशा शब्दात शिवसेनेचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले होते.
“मराठवाड्याला दुष्काळमुक्त करू”; मुक्तिसंग्राम दिनानिमित्त नांदेडमध्ये उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
दानवेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कुठे राजकारण करायचे हे विरोधकांनी ठरवले पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. विरोधी पक्षांना घोषणाबाजीशिवाय दुसरे कुठले काम नाही, असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
[ad_2]