[ad_1]
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पनवेलमध्ये होत असलेल्या भाजपाच्या बैठकींची माहिती देताना त्यातील राजकीय प्रस्तावांचीही माहिती दिली. यात एक प्रस्ताव राज्यातील सरकार उलथवून टाकण्यासाठी लढणाऱ्यांच्या अभिनंदनाचा असल्याची माहिती केशव उपाध्ये यांनी दिली. तसेच हा प्रस्ताव आमदार सुधीर मुनंगटीवर मांडणार असून त्याला आमदार आशिष शेलार अनुमोदन देतील, असंही नमूद केलं. ते शनिवारी (२३ जुलै) पनवेलमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
केशव उपाध्ये म्हणाले, “भाजपाच्या बैठकीत राजकीय प्रस्तावात हिंदुत्वाचा विचार वर जनादेशासाठी लढणाऱ्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. अनेक वर्षांनंतर २०१९ ला भाजपा व शिवसेना युतीला १६१ जागांचं स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र, त्यावेळी जनादेशाचा अपमान करत शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीची साथ घेतली आणि महाविकास आघाडी सरकार आलं. त्यामुळे मागील अडीच वर्षे हिंदुत्व तर सोडलंच होतं, पण करोना, भ्रष्टाचाराची प्रकरणं, १०० कोटीच्या खंडण्या अशा अनेक प्रश्नांमध्येच गेली.”
“सरकार उलथवून टाकून जनभावनांचं आदर करणारं सरकार आणलं”
“अशाप्रकारचं सरकार उलथवून टाकून जनभावनांचं आदर करणारं सरकार महाराष्ट्रात आलं. हिंदुत्वाचं विचार जपणारं सरकार महाराष्ट्रात आलं. यासाठी लढणाऱ्यांचं अभिनंदन या राजकीय प्रस्तावात आहे. याशिवाय संवैधानिक विषय आणि बोलणाऱ्यांची गळचेपी केली याचाही या राजकीय प्रस्तावात समावेश आहे,” अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली.
हेही वाचा : शिंदे गटाच्या बंडखोरीची स्क्रिप्ट कुणी लिहिली? यापूर्वी असा प्रयत्न झाला होता का? उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याने केला गौप्यस्फोट
“ज्या सरकारवर आपल्या आमदारांचा विश्वास नव्हता. सुरुवातीला राज्यसभा नंतर विधान परिषद निवडणुकीत हे दिसलं. ते सरकार पाडून नवं सरकार आलं या राजकीय घटनांचा उल्लेख या राजकीय प्रस्तावात आहे. हा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार मांडतील, त्याला आशिष शेलार अनुमोदन देतील,” असंही उपाध्ये यांनी नमूद केलं. पनवेलमधील बैठकीची माहिती देताना केशव उपाध्ये यांच्यासोबत गणेश हाके व ओमप्रकाश देखील उपस्थित होते.
[ad_2]