[ad_1]
राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई कोकणसह विदर्भ आणि मराठवाड्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. या जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये पूरजन्य परिस्थीती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नागपूर विमानतळावर दाखल झाले आहेत. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ऐवजी ते रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे रवाना झाले आहेत.
राज्यातील आठ जिल्ह्यांत एनडीआरएफच्या तेरा तुकड्या तैनात
विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांनी शिंदे आणि फडणवीसांना नागपूर विमानतळावर पूर्व विदर्भातील पूरजन्य परिस्थितीचा आढावा दिला. तसेच पूरग्रस्त भागातील नागरीकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. येत्या ४८ तासांत विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून राज्यात अनेक ठिकाणी बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. विदर्भातील पूरपरिस्थिती गंभीर असून आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने राज्यात मंगळवापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत ६४ मिमी ते २०० मिमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पूरस्थिती आणि आपत्कालीन मदतीसाठी प्रशासनाने राज्यातील आठ जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) १३ तुकडय़ा, तर राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एसडीआरएफ) दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
विदर्भात पावसामुळे १४ जणांचा मृत्यू
विदर्भातील गोसेखुर्द आणि बेंबळा प्रकल्पाची दारे उघडण्यात आली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासूनू विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. नद्यांना पूर आला आहे. विदर्भात पावसामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात वर्धा जिल्ह्यातील सहा, गडचिरोलीतील चार, अमरावतीतील दोन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
[ad_2]