काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला तामिळनाडून सुरुवात झाली. ती आता केरळमधून कर्नाटकमध्ये पोहचली आहे. या यात्रेतील एका फोटोवरून भाजपाने राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे.
कर्नाटकातील पदयात्रेत राहुल गांधी यांचा ऊस खात असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले, “राहुल गांधी पंतप्रधान झाले नाहीत, होणारही नाहीत. पण विको वज्रदंतीचे ब्रँड ॲम्बेसडर नक्की होतील,” असा टोला भातखळकर यांनी राहुल गांधींना लगावला आहे.
हेही वाचा – “अजित पवारांनी पंधरा वर्षे निवांत रहायचं”, शहाजी बापू पाटलांचा टोला; म्हणाले, “शीवतीर्थावर राष्ट्रवादीचा…”
यात्रेला कोणीही रोखू शकत नाही
सध्या काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा कर्नाटकमध्ये असून म्हैसूरमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या जाहीरसभेत मुसळधार पाऊस सुरू असतानाही राहुल गांधी यांनी भाषण केले. ‘कन्याकुमारीहून निघालेली ही यात्रा काश्मीपर्यंत जाणारच. या यात्रेला कोणीही रोखू शकत नाही, अगदी पाऊससुद्धा नाही. बघा इथे पाऊस पडतो आहे, पण, आपल्या यात्रेत खंड पडलेला नाही’, असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा – “गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी छोटीशी भेट”; जम्मू कारागृह महासंचालकांच्या हत्येनंतर दहशतवादी संघटनेचा इशारा
सोनिया गांधीही सहभागी होणार
आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी देखील ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता भारत जोडो यात्रेत सहभागी होतील. त्यासाठी त्या सोमवारी म्हैसूरला पोहोचल्या. सोनियांचा सहभाग आणि कदाचित त्यांची होणारी जाहीर सभा ‘भारत जोडो’ यात्रेला भाजपशासित कर्नाटक राज्यामध्ये अधिक यशस्वी करू शकेल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. ४ व ५ ऑक्टोबर हे विश्रांतीचे असून या दोन दिवसांमध्ये यात्रेच्या आगामी टप्प्याची आखणी केली जाईल. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सोनिया व राहुल पहिल्यांदाच एकत्रितपणे सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत ‘भारत जोडो’ यात्रेने तमिळनाडूमध्ये ६२ किमी, केरळमध्ये ३५५ किमी व तीन दिवसांत कर्नाटकमध्ये ६६ किमीचा पल्ला गाठला आहे. अजून १८ दिवस ही यात्रा कर्नाटकमध्ये असेल. नंतर ती आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तेथून महाराष्ट्रात प्रवेश करेल.