[ad_1]
भाजपा आमदार जयकुमार गोरे यांना सर्वोच्च न्यायालयाने देखील झटका दिला आहे. जयकुमार गोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांच्यावर जमिनीची खोटी कागदपत्रे बनवून घोटाळा केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात आमदार गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने आमदार जयकुमार गोरे यांना आधी कोर्टापुढे शरण येण्याचे आणि मग जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे गोरे यांना आता वडूजच्या न्यायालयासमोर हजर राहून मगच जामिनासाठी अर्ज करता येणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
आमदार जयकुमार गोरे यांच्यासह एकूण सहा जणांवर मायणी गावातील जमिनीबाबत खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात दहिवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे जमिनीची खोटी कागदपत्रे बनवण्यात तलाठी देखील आरोपी आहे. आरोपी तलाठी सध्या फरार आहे.
हेही वाचा : शिवसेना म्हणते, “शिंदे-फडणवीसांचे सरकार बेकायदेशीरपणे महाराष्ट्राच्या जनतेवर लादले गेले, न्यायाला जेवढा उशीर होईल तेवढे…”
या प्रकरणात आतापर्यंत आरोपी संजय काटकरला अटक झाली आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने गोरे यांनी आधी मुंबई उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नाही.
[ad_2]