Headlines

bjp ashish shelar slams shivsena aaditya thackeray on vedanta foxconn project

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू आहे. वेदान्त कंपनीने प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करत असल्याचं जाहीर केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना जबाबदार धरत असून त्याअनुषंगाने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून २६ सप्टेंबरची तारीख असलेल्या एका सरकारी कागदाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या एका उत्तराची माहिती आहे. यावरून आशिष शेलार यांनी थेट आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही महिन्यांपासून वेदान्त-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर्स तयार करण्याचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याची चर्चा सुरू होती. ठाकरे सरकारनंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनीही हा प्रकल्प राज्यात येत असल्याचं विधानसभेतील भाषणादरम्यान जाहीर केलं होतं. मात्र, त्यानंतरही हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकल्पामुळे राज्यात येऊ घातलेला दीड ते दोन लाख तरुणांचा रोजगार गुजरातला गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर आधीच्या ठाकरे सरकारच्या अकार्यक्षमतेमुळेच हा प्रकलप् राज्याबाहेर गेल्याचा दावा सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपानं केला आहे.

काय म्हणाले आशिष शेलार?

आमदार राम कदम यांनी मावळमध्ये वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात आंदोलन करू नये, अशी विनंती करणारं महाराष्ट्र औद्योगिक मंडळाचं एक पत्र आशिष शेलार यांनी केलेल्या ट्वीटमध्ये शेअर केलं आहे. ‘वेदान्त-फॉक्सकॉन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा अद्याप एमओयू झालेला नाही. वेदांत फॉक्सकॉन कंपनीस महामंडळाकडून जागेचे वाटप झालेले नाही. त्यामुळे जागेचा सर्व्हे क्रमांक याबाबत माहिती देता येत नाही’, असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Vedanta Foxcon : केवळ नौटंकी सुरू आहे, महाविकास आघाडीच्या काळात काहीच झालं नाही – फडणवीस

‘ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात वेदान्त -फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली, ना कुठला करार केला. हा घ्या सरकारी पुरावा. प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडीच वर्षं कंपनीला का लटकवलं? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरु होत्या का? चौकशी झालीच पाहिजे!’ अशी मागणी आशिष शेलार यांनी या ट्वीटमध्ये केली आहे.

‘चौकशीला सामोरे जा, अजून बरंच निघेल’

दरम्यान, यासोबत केलेल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना चौकशीला सामोरे जाण्याचं आव्हान दिलं आहे. ‘या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी! चौकशीला समोरे जा. अजून बरेच निघेल! अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करु नये?” असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, एकीकडे वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेलेला असताना दुसरीकडे बल्क ट्रक पार्क आणि मेडिसिन पार्क हे प्रकल्पही शिंदे सरकारमुळे राज्याबाहेर गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी तळेगावमध्ये काढलेल्या जनआक्रोश यात्रेदरम्यान केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *