Headlines

arjun khotkar meet chief minister eknath shinde raosaheb danve zws 70



औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणाऱ्या बंडखोर आमदारांना उंदराची उपमा देत भाषण करणारे अर्जुन खोतकर सोमवारी मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी दिलजमाई करताना दिसले. त्यांचे असे एकत्र दिसण्याचा अर्थ ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत, असा काढला जात आहे. आपण शिंदे गटात गेलो आहोत, असे खोतकर यांनीही स्पष्टपणे सांगितलेले नाही. मात्र, ही दिलजमाई ‘ईडी’ च्या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या खोतकर यांना करावी लागल्याचा अर्थ काढला जातो.

खोतकर यांच्यावर अर्जुन सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार केल्याचा ठपका सक्तवसुली संचालनालयाने ठेवला होता. चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खोतकर यांच्याकडे नुकतेच शिवसेनेने उपनेतेपद दिले होते. जालन्यातील सहकार क्षेत्रावर अर्जुन खोतकर यांचा मोठा प्रभाव राहिला. गेली १४ वर्षे जालना बाजार समितीवर त्यांचे वर्चस्व होते. गेल्या आर्थिक वर्षांतील या बाजार समितीची उलाढाल ७०० ते ८०० कोटींच्या घरात होती. तर अर्जुन सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक होते.

राज्यातील ५४ सहकारी साखर कारखाने कमी किमतीमध्ये नेत्यांनी हडप करण्याचा डाव रचला होता, असा आरोप कॉ. माणिक जाधव यांनी केला होता. या आरोपांची तक्रार पुढे अण्णा हजारे व जाधव यांनी मुंबई येथील रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीत अर्जुन सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहारावरही बोट ठेवण्यात आले होते. नंतर आर्थिक गुन्हा शाखेने केलेला तपास सक्तवसुली संचालनालयाने पुढे आपल्या ताब्यात घेतला. या प्रकरणात अर्जुन खोतकर यांना नोटीसही बजावण्यात आली. या गैरव्यवहारातील तपशील भाजपचे किरिट सोमय्या यांनी वारंवार पत्रकार बैठका घेऊन जगजाहीर केले होते. राज्य सहकारी बँकेचे ३३ कोटी रुपयांचे कर्ज परतफेड न करू शकल्याने या कारखान्याची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा विक्री करताना कारखान्याची राखीव किंमत ४२ कोटी १८ लाख रुपये एवढी जाहीर करण्यात आली. तापडिया कन्स्ट्रक्शन कंपनीने हा कारखाना विकत घेतला आणि तो पुढे अर्जुन शुगर इंडस्ट्रीजला विकला. या व्यवहारात पद्माकर मुळे व जुगलकिशोर तापडिया यांचीही ‘ईडी’ने चौकशी केली होती. कारखान्याचे मूल्यांकन ७८ कोटी ३८ लाख असताना ती किंमत कमी दाखवून हा कारखाना विकत घेण्याचा घाट घालण्यात आला. कारखाना विकत घेताना तापडिया कन्स्ट्रक्शन कंपनीला अर्जुन खोतकर यांनीच आर्थिक मदत केली, असा ठपका त्यांच्यावर आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्या चर्चेला खोतकर यांनीच पूर्णविराम दिला होता. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद मेळाव्यात बंडखोर आमदारांवर टीका करताना ते म्हणाले, ‘घरात माणसं असतात, तशी उंदीरही असतात.’ बंडखोर आमदारांना उंदीर अशी उपमा दिल्यानंतर शिवसैनिकही चेकाळले. मांजर पाळा, असेही त्यांनी सुचवून पाहिले. त्यावर मी बोलू का, असे म्हणत खोतकर यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्ली येथे घडलेल्या घटनांमुळे खोतकर चर्चेत आले.

अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये २०१४ नंतर राजकीय संघर्ष कायम होता. या राजकीय संघर्षांला सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचेही पाठबळ होते. अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी गळ त्यांना घातली जात होती. जालना विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे खोतकर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये पशुसंवर्धन विभागाचे राज्यमंत्री होते. या काळात ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची ते स्तुती करत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खोतकर यांच्यात मैत्रभाव होता. मात्र, रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यातील राजकीय संघर्षांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात त्यांना सहभागी करून घेण्यापूर्वी या दोन नेत्यांची दिलजमाई होणे आवश्यक मानले जात होते. सोमवारी अशी दिलजमाई झाली. रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनीही दिलजमाईच्या वृत्तास दुजोरा दिला. मात्र, खोतकर शिंदे गटात गेले की नाही, याची अधिकृत घोषणा सोमवारी दुपापर्यंत झालेली नव्हती.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही चर्चा

नवी दिल्ली : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यामुळे या आघाडीतील घटक पक्षांच्या सदस्यांना शिंदे गट वा भाजपचा रस्ता खुणावू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी दुपापर्यंत दिल्लीमध्ये होते. या भेटीत शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम करण्याचे निश्चित केल्याचे स्पष्ट झाले.

शिंदे यांनाच नव्हे तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे व पक्षाचे माजी आमदार राजन पाटील या दोघांनी भेट घेतल्याने फक्त शिवसेनेतच नव्हे तर दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांनाही कमळ मोहीम लागू करण्याचा भाजपचा इरादा असल्याचे मानले जात आहे.

जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्यासारख्या आक्रमक शिवसैनिकाने शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातही भाजपचे नेते, केंद्रीयमंत्री आणि जालनाचे खासदार रावसाहेब दानवे यांनीच खोतकरांना शिंदे यांच्याकडे नेल्यामुळे भाजपचे नेते शिवसेनेला खिंडार पाडण्यात प्रत्यक्ष सहभागी झालेले दिसले. खोतकरांनी शिंदे यांची भेट घेतली तेव्हा दानवेंसह शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, धैर्यशील माने, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील, कृपाल तुमाने, सदाभाऊ लोखंडे अशी शिंदे गटाची फौज उपस्थित होती. मुख्यमंत्री शिंदे सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळय़ाला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आले होते. हा सोहळा झाल्यानंतर शिंदे व फडणवीस यांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

असाही एक वाद : विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ संपल्यानंतरही अर्जुन खोतकर यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकचा वेळ दिल्याची तक्रार प्रतिस्पर्धी उमेदवार कैलास गोरंटय़ाल यांनी केली होती. उच्च न्यायालयाने हे आरोप मान्य करून खोतकर यांना विधिमंडळ सदस्य म्हणून अपात्र ठरविले होते. जालना विधानसभा मतदारसंघात खोतकर तीन वेळा गोरंटय़ाल यांच्या विरोधात निवडून आले आहेत. १९९० साली ते पहिल्यांदा आमदार झाले होते. घनसावंगी मतदारसंघातूनही त्यांनी एकदा निवडणूक लढविली होती.



Source link

Leave a Reply