[ad_1]
राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारने आज नाति आयोगासोबत झालेल्या बैठकीनंतर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार नीति आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्वतंत्र अशी संस्था निर्माण केली जाणार असून, इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन असे या संस्थेचे नाव असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(रविवार) मुंबईत माध्यमांनी ही माहिती दिली आहे.
या संदर्भात माध्यमांना माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नीति आयोगसोबत एक बैठक झाली. नीति आयोगाचे सीईओ आणि संपूर्ण टीम या बैठकीस हजर होती. मूळातच या बैठकीचं उद्दिष्ट असं होतं की, नीति आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील एक इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ही तयार करायची. त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारच्यावतीने आम्ही देखील सादरीकरण केलं. विविध सेक्टरमध्ये कशाप्रकारे मदत होऊ शकते याबाबत नीति आयोगाने देखील सादरीकरण केलं. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टील तत्वत: संमती दाखवली आहे, की अशा प्रकारची एक संस्था आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू. लवकरच या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा निर्णय आम्ही घेऊ. ही संस्था कशी असेल, त्या अंतर्गत काय येईल या सर्व बाबी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आपल्या पर्यंत पोहचण्यात येतील.”
याचबरोबर, “प्रामुख्याने मॉनिटाइझेन ऑफ अॅसेट्सचा विषय असेल किंवा ब्लॉक चेन इन अॅग्रीक्ल्चर असेल, ईव्ही पॉलीस असेल, अपारंपारिक उर्जेचा वापर अधिक करण्याचे विषय असतील, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून हेल्थ केअर आणि कृषी क्षेत्र यामध्ये परिर्वतनाचा विषय असेल, असे अनेक विषय चर्चेला आलेले आहेत. या सगळ्या विषयांवर नीति आयोगाने प्रचंड अभ्यास केलेला आहे. नीति आयोगाने एक महत्त्वाचं टूल तयार केलं ज्यामध्ये राज्यातील सर्व विभागात तयार होणारा माहितीसाठा एकत्रित होऊन, त्याचं परीक्षण होऊन त्याच्या आधारावर आपल्याला निर्णय घेता यावेत, अशाप्रकारची व्यवस्था त्यांनी उभी केलेली आहे. ती व्यवस्था राज्यातही उभी करण्यासाठी आम्ही सूतोवाच केलं आहे. ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी या महत्त्वकांक्षी प्रकल्पासंदर्भातही आम्ही नीति आयोगसोबत काम करत आहोत. या सर्व गोष्टी आज चर्चेत आल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात नीति आयोगाच्या धर्तीवर एक ट्रान्सफर्मेशन करणारी इन्स्टिट्यूट आम्ही तयार करणार आहोत.” असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
याशिवाय, राज्यात संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, “संततधार पावसामुळे जिथे पिकाचं नुकसान झालेलं असेल आणि ३३ टक्क्यांच्यावर नुकसान असेल, तिथे मदत केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच केलेली आहे. त्या संदर्भात काही अध्यादेश निघाले आहेत तर काही निघत आहेत. आता पुन्हा पाऊस पडला आहे त्यात जर का नवीन क्षेत्र बाधित झालं असेल, तर त्याचे देखील पंचनामे करण्यात येतील आणि त्यांनाही मदत करण्यात येईल.”
[ad_2]