[ad_1]
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध राजकीय घटनांवर वाद सुरू असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं मौन चर्चेचा विषय ठरलं होतं. आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व राजकीय वादांवर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी अनेक मुद्द्यांवरून अजित पवारांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. राज्यातील नेतेमंडळींची सुरक्षा काढणं आणि पुरवणं या मुद्द्यावरून अजित पवारांनी सरकारला खोचक शब्दांत सुनावलं. तसेच, माहिती अधिकारात यासंदर्भातली माहिती मागवली असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.
“…तर मग सरकार काय करतंय?”
“मध्यंतरी अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या दोन गटांत गोळीबाराची घटना घडली. कशावरून? बैलगाडा शर्यतीवरून. अशा कारणावरून जर दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना होत असेल, तर सरकार काय करतंय? पोलीस यंत्रणा काय करतेय?” असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
“ठाण्यात किसननगर भागात ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा राडा झाला. अशी राडेबाजी करून नाही चालणार. त्यामुळे पोलिसांना बाकीच्या गोष्टी सोडून याच गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल”, असंही अजित पवार म्हणाले.
“तुम्ही दारू पिता का?”, अजित पवार मंत्री अब्दुल सत्तारांवर संतापले, म्हणाले, “सहज बोलायला…”
“अरे हा पैसा काही तुमचा नाही”
“मी अधिवेशनात प्रश्न विचारला आहे. माहिती अधिकारात माहितीही मागवली आहे. किती लोकांना वाय प्लस दर्जा आहे. त्याची खरंच त्यांना गरज आहे का? काही काहींचा ताफा तर बघायलाच नको. मी स्वत: उपमुख्यमंत्री होतो. पण मी जर जास्त गाड्या असल्या, तर सांगतो ‘गाड्या कमी करा. काही अधिकाऱ्यांनी त्या कामात यायचं कारण नाही’. आज २०-२५-३० गाड्यांचा सरकारचा ताफा असतो. अरे हा पैसा काय तुमचा नाहीये. सरकारचा पैसा आहे. टॅक्स स्वरुपात आलेला पैसा आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.
“आता तो माजी आहे, त्याला कोण काय करतंय?”
“ज्या आमदारांना बंदोबस्त द्यायची गरज आहे, त्यांना दिलाच पाहिजे. कारण त्यांचं, नागरिकांचं, महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण सरसकट सगळ्यांना सुरक्षा कशाला? काही काही तर माजी नगरसेवक आहेत. ते माजी आहेत, तरी त्यांच्यासोबत स्टेनगन धरून दोन पोलीस असतात. अरे त्याला कोण खातंय, कोण काय करतंय? तो आता माजी झालाय ना बाबा. त्यानं काही गंभीर चुका केल्या असतील, तर तो त्याचं निस्तरेल. त्याच्यासाठी सरकारी यंत्रणेचं संरक्षण देण्याचं काय कारण आहे? पोलीस यंत्रणेचं संरक्षण देण्याचं काय कारण आहे?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
[ad_2]